न्याहरी हा दिवसभराच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. न्याहरी राजासारखी असावी असेही आपल्याकडे म्हटले जाते. रात्री झोपलेलो असताना रक्ताभिसरण क्रिया वेगाने होत असल्याने सकाळी उठल्यावर चांगला पोषक आहार घेणे आवश्यक आहे. सकाळी उठल्या उठल्या चहा घेण्याची भारतीय पद्धतही चुकीची असून त्याऐवजी एखादे फळ, खजूर किंवा सुकामेवा खायला हवा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. सध्या प्रत्येक जण आपल्या वजनाबाबतही बराच दक्ष असतो. त्यामुळे आहाराबाबतची जागरुकता वाढलेली दिसते. यामध्ये न्याहरीमधील खाण्याचा वाटा महत्त्वाचा असून ते अन्न जास्तीत जास्त पोषक असावे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास तर मदत होतेच पण दीर्घकाळासाठी पोट भरलेले राहण्यासाठीही या पदार्थांचा उपयोग होतो. आता हे पदार्थ नेमके कोणते पाहूया. अंडी अंडे खाणे शरीरासाठी फायदेशीर असते असे आपण अनेकदा ऐकतो. अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असतेच त्याचबरोबर अंड्यात अनेक जीवनसत्त्वेही असते. अंड्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहिल्याने बराच वेळ भूक लागत नाही. दही दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चांगले पोषण होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि डीचे प्रमाणही असल्याने त्याचा पोषणासाठी चांगला उपयोग होतो. दह्यामुळे शरीरावरील वाढलेली चरबी कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे न्याहरी करत असताना त्यासोबत दही खाल्ल्यास नक्कीच फायदेशीर ठरु शकते. ओट्स ओट्समध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने तुमचा मेटाबॉलिझम रेट वाढतो आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय ओट्समध्ये प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते. पिनट बटर शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी फायबरची आवश्यकता असते.पिनट बटरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा ही चरबी कमी होण्यासाठी उपयोग होतो. तसेच शरीराला आवश्यक असणारी प्रथिने मिळतात. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)