सुंदर लांबसडक केसांमुळे प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसत असतं. काळे आणि घनदाट केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. मात्र केसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यात बहुतेक वेळा केस गळणे, डोक्यात कोंडा होणे, टक्कल पडणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. केस गळणे आणि त्यांची पुन्हा निर्मिती होणं ही क्रिया सतत सुरु असते. मात्र ठराविक वयानंतर केसांची वाढ होण्याची क्रिया थांबते. याशिवाय अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे केस गळत असतात. मात्र आपल्याला केसगळतीचे खरे कारण कधीच समजत नाही. केसगळतीची अशीच काही कारणं सांगितली आहेत अंशिका शारदा यांनी - १. अनुवंशिकता - जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसत असते. रंग,रुप, चेहरा, उंची, वागण्या-बोलण्याची पद्धत एवढेच काय तर एखाद्या व्याधीही अनुवंशिकतेने पुढच्या पिढीकडे जात असते. यातच केसांची वाढ हीदेखील अनुवंशिकतेनुसारच होत असते. त्यामुळे जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. मात्र यावर ट्रिटमेंट घेतल्यानंतर ही समस्याही दूर होऊ शकते. २. वय- वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. हेच बदल आपल्या केसांच्या बाबतीतही होतात. वय वाढू लागल्यावर केसांची वाढ थांबलेली असते. नव्याने केस उगवण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली असते. त्यामुळे जे केस आहेत तेच टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. केस गळत असल्यास योग्य त्यावेळी उपचार केल्यास कधीही चांगले अन्यथा टक्कल पडण्यासारख्या समस्या निर्माण होतात. ३. हार्मोन्समध्ये बदल होणे- पॉलिसिस्टिक ओवेरी सिंड्रोम, गरोदरपण, मेनोपॉज या काळात हार्मोन्समध्ये बदल होत असतो. शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यास केसांची वाढ थांबते. त्यामुळे याचा परिणाम केसांवर होऊन केस गळू लागतात. विशेष म्हणजे या हेअरफॉलचे प्रमाणही अधिक असते. मात्र या हेअर फॉलमुळे टक्कल जरी पडत नसले तरी केसांची घनता कमी होऊन केस पातळ होतात. ४. पोषकतत्वांची कमतरता - शरीरात मुबलक प्रमाणात पोषकद्रव्यांची आवश्यकता असते. शरीरात झिंक, बायोटिन, प्रोटीन ही पोषकतत्व कमी असल्यास केसांची मुळे कमजोर होऊन केसांची गळती होऊ लागते. तसेच शरीराला योग्य प्रमाणात पोषकतत्व न मिळाल्यास केस गळणे, नखं वारंवार तुटणे, रक्ताची कमतरता भासणे या सारख्या समस्या निर्माण होतात. ५. थायरॉईडची समस्या- शरीरात कोणत्याही घटकाचे कमी किंवा प्रमाण अधिक झाल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यातच सध्याच्या जीवनशैलीमुळे थायरॉईची समस्या निर्माण झाली आहे. शरीरात थायरॉईडचे प्रमाण जास्त झाल्यास केसगळती होण्यास सुरुवात होते. यामध्ये केसांची गळती लवकर होत असून त्याच्या तुलनेत केसांची वाढ कमी होते. अशा वेळी टक्कल पडण्याचीही शक्यता असतो. त्यामुळे संतुलित आहार केल्यास थायरॉईड सारख्या समस्या निर्माण होत नाहीत.