टेलिकॉम सेक्टरमधील दोन दिग्गज स्पर्धक कंपन्यांमध्ये एक करार झाला आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यात हा करार झाला आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या स्पर्धक कंपन्यांनी स्पेक्ट्रम (वायू तरंग) वापरण्याचे अधिकार संपादन करणारा सामंजस्य करार केला आहे.

फायदा काय? :-

या करारानुसार, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबई परिमंडळातील ८०० मेगाहर्ट्झ वर्णपटातील एअरटेलकडील वायू तरंग वापरण्याचा जिओला अधिकार मिळणार आहे. त्यासाठी जिओने १,४९७ कोटी रुपयांचा मोबदला देऊ केला आहे. या करारामुळे तिन्ही सर्कलमध्ये जिओच्या ग्राहकांना चांगलं नेटवर्क मिळेल. या करारामुळे जिओला देशातील सर्वाधिक मोबाइल फोन वापरकर्त्यांची  घनता असलेल्या दिल्ली, मुंबईसारख्या क्षेत्रात अतिरिक्त स्पेक्ट्रमचा फायदा मिळू शकणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तिचे सेवा जाळे आणखी सक्षम बनू शकेल, व नेटवर्क क्षमता अजून वाढेल. जिओला आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईमध्ये एअरटेलच्या 800 मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमचा वापर करता येणार आहे. तर, दुसरीकडे भांडवलाची प्रचंड चणचण भेडसावत असलेल्या एअरटेलला या आघाडीवर काहीसा दिलासा मिळविता येणार आहे. अद्याप या कराराला मंजुरी मिळालेली नाही, नियामक यंत्रणेची तसेच वैधानिक मंजुरी मिळविल्यानंतरच दोन कंपन्यांतील हा करार मार्गी लागणार आहे.

भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी गोपाल विठ्ठल यांनी, जिओबरोबर झालेला हा करार म्हणजे तीन परिमंडळामधील ८०० मेगाहर्ट्झ ब्लॉक्सच्या विक्रीद्वारे कंपनीने उपयोगात नसलेल्या स्पेक्ट्रमचा वापर कंपनीच्या सक्षमीकरणासाठी केला आहे. कंपनीने आखलेल्या धोरणाला अनुसरूनच हे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.