देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)ने सप्टेंबर महिन्यात आपल्या नियमांत अनेक मोठे बदल केले आहेत. यामध्ये मुदत ठेवी, कर्ज, एटीएममधून पैसे काढण्याशी संबंधित नियमात बदल केले आहेत. नियम बदलल्यामुळे त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल. जर तुम्ही SBI खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. डेबिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढताना झालेल्या फसवणुकीच्या घटनेमुळे एसबीआयने हा नवीन नियम आणला आहे. या नियमांनुसार, १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी OTP टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आधी हा नियम लागू करण्यात आला होता तेव्हा रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेसाठी हा नियम ठेवण्यात आला होता. मात्र १८ सप्टेंबरपासून शुक्रवारपासून हा नियम २४ तासांसाठी लागू असणार आहे. त्यामुळे यापुढे SBI च्या कोणत्याही एटीएममधून १० हजारांपक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास तुमचा मोबाईल जवळ असणे आणि हा मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. एटीएम वापरणाऱ्या सर्व ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक लिंक करुन घ्यावा अशी सूचना एसबीआय मार्फत देण्यात आली आहे. दरम्यान, १ जानेवारी पासून बँकेनं रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीत एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताना ओटीपी आधारित सेवा सुरू केली होती. परंतु आता ओटीपी आधारित सेवा चोवीस तासांसाठी लागू असणार आहे. म्हणजेच आता एटीएमच्या पीनसह ग्राहकांना आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपीही टाकावा लागणार आहे. ओटीपी सेवेद्वारे एटीएममधून पैसे मिळण्याची सुविधा सुरू केल्यानंतर ग्राहकांच्या खात्याची अधिक सुरक्षा होणार आहे. तसंच यामुळे कार्डधारक, अधिक पैसे काढणे, कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि अन्य प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करु शकतील, असं मत स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ( रिटेल आणि डिजिटल बँकींग) सी.एस.शेट्टी यांनी सांगितलं.