निसर्गातील शक्तिशाली प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) कशी बनतात याचे कोडे भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह एका गटाने उलगडले आहे, सध्या कृत्रिम प्रतिजैविकांचा प्रभाव कमी होत चालल्याने नवीन प्रतिजैविके तयार करण्यास त्यामुळे मदत होणार आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.संशोधकांनी प्रतिजैविक गुणधर्म असलेल्या काही संयुगांवर लक्ष केंद्रित केले होते. निसीन या दुधातील पदार्थाचे विश्लेषण प्रयोगशाळेत केले असता त्यात प्रतिजैविक गुणधर्म दिसून आले. ते अन्नात अन्नरक्षक म्हणून वापरले जाते. निसीन हे अन्नातील जंतूंपासून रक्षण करते त्याचा वापर १९६० पासून सुरू झाला. निसीनच्या जनुकीय रचनेचा वैज्ञानिकांना अंदाज होता व निसीनमध्ये पेप्टाइड या अमायनो आम्लांची साखळी असते व त्यांच्या जनुकांची विशेष संकेतावली असते. पेप्टाइडमध्ये पेशीत प्रवेश केल्यानंतर अनेक बदल होतात व त्याला अंतिम रचना प्राप्त होते. संशोधकांनी या बदलांचा अभ्यास गेली २५ वर्षे केला आहे. स्पॅघेटीसारखी असलेली पेप्टाइडची रचना सुरुवातीला पाच कडय़ांच्या आकारात बदलते असे इलिनॉइस विद्यापीठाचे प्राध्यापक विल्फ्रेड व्हॅनडर डोंक यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत भारतीय वंशाचे जैवरसायनशास्त्रज्ञ सतीश के नायर यांनी काम केले आहे. कडय़ासारखा आकार निसीनला प्रतिजैविक म्हणून काम करण्यास उपयोगी ठरतो त्यामुळे जीवाणूंच्या पेशीभित्तिका उद्वस्त होतात व इतर तीन कडी जीवाणूंच्या अर्धपारपटलास छिद्रे पाडतात. या दुहेरी कृतीमुळे जीवाणूंना प्रतिजैविकास विरोध करता येत नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यापूर्वीच्या संशोधनानुसार डिहायड्राटेज हे या अमिनो आम्लांची रचना बदलण्यात कार्यरत होते पण संशोधकांच्या मते ते कसे घडते हे माहीत नव्हते ते आता कळले आहे. अन्नातून होणारे रोग किंवा घातक जीवाणू संसर्गामुळे होणारे रोग बरे करण्यासाठी त्यामुळे औषधाचे नवे रेणू तयार करणे शक्य होईल असे व्हँडर डोंक यांचे मत आहे. निसीनच्या स्थित्यंतरासाठी ग्लुटामेट हे अमायनो आम्ल गरजेचे असते असे मॅन्युअल ओरटेगा या विद्यार्थ्यांने शोधून काढले आहे. डिहायड्रोटेजमुळे दोन गोष्टी होतात एक म्हणजे निसीन पेप्टाइडमध्ये ग्लुटामेट मिसळले जाते व दुसरे म्हणजे नंतर ते नष्टही केले जाते. नेचर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.संशोधनाचे महत्त्वनिसर्गातील प्रतिजैविकांची एक विशिष्ट रासायनिक रचना असते त्यामुळे ते जीवाणूंना नामोहरम करू शकतात, या प्रतिजैविकांच्या रासायनिक रचनेचा अभ्यास केल्याने प्रतिजैविक औषधांचे जीवाणूंना दाद न देणारे रेणू तयार करणे शक्य आहे. आताची प्रतिजैविके निष्प्रभ ठरत असताना नवीन प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी भारतीय वैज्ञानिक सतीश नायर यांच्यासह काही वैज्ञानिकांनी केलेले संशोधन उपयुक्त आहे.