भारत एक विशाल देश असून इथली विविधतेत नटलेली एकता, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे येत असतात. प्रवास करणे प्रत्येक वयाच्या लोकांना आवडते. कारण प्रवासामध्ये एक वेगळा आनंद, समाधान असते. भारतात अनेक अशा जागा आहेत जिथे सौंदर्य आणि शांतता एकाचवेळी तुम्हाला अनुभवता येईल. समुद्र किनारे अशा जागांपैकी एक आहेत. समोर पसरलेला विशाल, अथांग सागर आणि किनाऱ्यावरची हिरवीगार वनराई मनाला मोहून टाकते. जाणून घेऊया देशातील काही समुद्र किनारे. - कोवालम बीच - कोवालम हा केरळमधला प्रसिद्ध बीच आहे. या बीचवरची शांतता आणि सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडते. तिरुवनंतपूरमपासून १८ किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. इथे येऊन लोक भरपूर आनंद लुटतात. - राधा नगर बीच - अंदमानमधील हॅवलॉक आयलँडचा बीच राधा नगर बीच म्हणून ओळखला जातो. टाइम मॅगजीनने २००४ साली या समुद्र किनाऱ्याला आशियातील सर्वोत्तम बीच ठरवले होते. ज्या लोकांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी राधा नगर बीच उत्तम ठिकाण आहे. - उल्लाल बीच - कर्नाटकातही सुंदर सुमद्र किनारे आहेत. कर्नाटकात मँगलोर, उल्लाल, देवबाग आणि गोकरणा बीच आहेत. यापैकी उल्लाल बीच फेमस आहे. कर्नाटकातील हा बीच लोकांना भरपूर आकर्षित करतो. - कलंगुट बीच - गोव्यातील कलंगुट बीच भरपूर फेमस असून इथे वर्षाचे बाराही महिने गर्दी असते. गोवा फिरायला येणारे पर्यटक हमखान या ठिकाणी येतात. इथे तुम्ही वॉटर स्पोटर्स आणि पॅराग्लायडिंगचा आनंद लुटू शकता. - जुहू बीच - मुंबईतला जुहू समुद्र किनाराही प्रसिद्ध आहे. मुंबई फिरायला येणारे बहुसंख्य पर्यटक हमखास या समुद्र किनाऱ्याला भेट देतात. बॉलिवूडचे अनेक कलाकारही या भागात राहत असल्याने जुहू बीचला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.