– योगेश मेहेंदळे

नरेंद्र मोदींचे भक्त किंवा त्यांना प्राणपणाने विरोध करणारे रूग्ण या दोन प्रकाराच्या उच्छादांनी सध्या सोशल मीडिया पोखरलाय. अगदी विराट कोहलीची बॅटिंग हा विषय सुरू असेल तरीदेखील, झाले का १५ लाख बँकेत जमा? किंवा तुमच्या खांग्रेसनं काय केल ६० वर्षात? या विषयावर गाडी हमखास घसरतेच. इंग्रजीत एक म्हण आहे If you are not part of solution then you are part of problem. त्याच धर्तीवर सध्याची अघोषित म्हण आहे If you are not नमोरूग्ण then you are संघी किंवा If you are not (so called) secular then you are नमोभक्त…

बरं तुम्ही तुमची बाजू मांडायला गेलात, की मानसोपचारतज्ज्ञाच्या थाटात सांगितलं जातं की आम्हाला माहित्येय तुम्ही काय सांगणार ते?
अरे ही तर हद्दच झाली, हे दोन्ही उच्छाद ५६ इंच नी १५ लाख नी स्वातंत्र्ययुद्धातला सहभाग नी गांधीहत्या नी पाच हजार वर्षांपूर्वीची संस्कृती नी नेहरू घराण्याचा त्याग या काहीही संबंध नसलेल्या गोष्टींचा चोथा फेकत तासन तास आपला डेटा कुरतडत असतात तरी आपल्याला देशभक्त नी सेक्युलर याची व्याख्या समजत नाही; आणि आपण मात्र काहीही लिहायच्या आधीच, त्यांनी आपल्या मनातलं सगळं सगळं जाणलेलं असतं. थोडक्यात त्यांनी एकतर्फी ठरवलेलं असतं, की हा आपल्या गोटातला नाही म्हणजे नक्कीच विरोधी गोटातला आह, ठोका याला…

पबमध्ये जाताना हातावर एक शाईचा शिक्का मारतात, की बाबा यानं पैसे भरलेत नी हा आता आज रात्रीपुरता इथला गिऱ्हाईक आहे. त्याप्रमाणे सोशल मीडियावर आपल्या कपाळावर एक अदृष्य शिक्का मारला जातो नमोभक्त किंवा नमोरूग्ण… मग त्याच नशेत विरोधकांवर खरी खोटी माहिती फेकत तुम्ही तुटून पडावं आणि महान देशकार्य करतोय या नशेत धुंद व्हावं ही अपेक्षा. तुम्हाला असा शिक्का मंजूर नसेल तर सोशल मीडियारूपी पबमध्ये जायला तुम्हाला मज्जाव आहे हे खुशाल समजा.

बरं हे चर्चा करणारे दुसऱ्याची थेट अक्कल काढतात. आपण स्वत: जेमतेम पदवीधर आहोत फार फार तर पोस्ट ग्रॅज्युएट आहोत हे विसरून मापं काढतात जागतिक किर्तीच्या अर्थतज्ज्ञांची. अर्थव्यवस्थेवर जितका उहापोह सोशल मीडियावर झालाय तितका कदाचित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येपण झाला नसेल. काही लाख कोटींचे आकडे असे आपल्या तोंडावर असे फेकले जातात की खेळातल्या व्यापाऱ्यात मलबार हिल नी जुहू गिरगाव वगैरे विकत घेतल्याचीच आठवण होते. सावरकर, गांधी, नेहरू, टिळक इतकंच काय छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील बघण्यासाठी दोनच चश्मे उपलब्ध आहेत, भक्ताचा किंवा रूग्णाचा… यातला कुठला चश्मा तुमच्या डोळ्याला फिट बसत नसेल तर तुम्ही सोशल मीडियाला दिसतच नाही मिस्टर इंडियासारखे…

राजकीय पक्षांचं एक गणित असतं. नेते कमी नी कार्यकर्ते जास्त असावे लागतात. गल्लीबोळातून प्रचार करायला, सतरंज्या टाकायला नी त्या उचलायला, टाळ्या वाजवायला गर्दी जमवायला, मतदानासाठी लोकांना बाहेर काढायला… एक प्रचंड हवा तयार करायला किंवा फुगा फोडायला प्रचंड मनुष्यबळ लागतं. अशा मनुष्यबळाला हाताशी धरून, चिरीमिरी देऊन चाणाक्ष नेते सत्तेच्या पायऱ्या चढतात. सोशल मीडियामध्ये प्रत्येक मोबाईलधारी हा आता अशा गर्दीचा भाग होऊ घातलाय. राजकीय पक्षांना आता रस्त्यावरील कार्यकर्त्यांबरोबरच या मोबाईलधारी कार्यकर्त्याची गरज आहे. बरं याला काही चिरीमिरीपण द्यावी लागत नाही. डोक्यात घुसवलेला भक्तिचा किंवा द्वेषाचा किडा त्याला आपसूक फुकट कार्यकर्ता करतो आणि मग मत मांडायचा अधिकार कधी उच्छाद होतो याचं त्याला भानही राहत नाही. तर भक्त किंवा रूग्ण जे कोणी असाल त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. एकमेकांची ख्याली खुशाली जाणण्यासाठी सुरू झालेला सोशल मीडिया प्रचाराची रणभूमी झालेली आहे. हा राजकीय खेळ चार वर्षांपूर्वी सुरू झालाय…

२०१४ साली सुरू झालेला हा खेळ २०१९ कडे आपण जसजसे जाऊ तितक्या जास्त तीव्रतेने खेळला जाणार आहे. असं म्हणतात की युद्ध केवळ रणांगणावर घडतं, ते प्रत्यक्षात लढलं जातं वॉररूमध्ये. त्याप्रमाणे २०१९च्या निवडणुका घडतील मतदार केंद्रात, मात्र ते प्राणपणानं लढलं जाईल सोशल मीडियावर… आणि त्याची सुरूवात केव्हाच झाली आहे… तिथून मागे परतता येणार नाही…पण

Social Media Day च्या निमित्तानं निदा फाजलींच्या या दोन ओळी सांगाव्याशा वाटतात.

दुश्मनी लाख सही, खत्म न किजे रिश्ता
दिल मिले या ना मिले, हात मिलाते रहिये!