सध्याच्या जगामध्ये सोशल मिडीयाच्या फायदा-तोट्याविषयी खूप चर्चा होत आहे. परंतु सोशल मिडियाच्या माध्यमातूनसुध्दा आत्महत्या टाळण्याचे काम करता येऊ शकेल असे तज्ज्ञांचे मत आहे. समुपदेशन आणि योग्य वेळी संवाद यातून आत्महत्या टाळता येऊ शकतात, असा विश्‍वास मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. आत्महत्या करण्याची प्रवृत्ती हा मनाचा रोग आहे. रागाच्या, निराशेच्या किंवा वैफल्याच्या एका विशिष्ट क्षणाला माणूस आत्महत्येचा प्रयत्न करतो. अशा लोकांना योग्यवेळी मार्गदर्शन केल्यास किंवा सल्ला दिल्यास त्या क्षणाला आत्महत्या टळू शकते. आत्महत्या करण्याची प्रबळ इच्छा होण्याचा तो क्षण सर्वात महत्त्वाचा असतो. त्या क्षणाला मन आवरले गेले तर आत्महत्या करण्याची इच्छा होत नाही. तसेच, त्या क्षणाला कोणीतरी सावरण्याची गरज असते.
सध्या आत्महत्या करण्याची इच्छा असणारे लोक आपल्या भावना फेसबूक किंवा ट्विटरवरून व्यक्त करायला लागले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीच्या भावना एखाद्या व्यक्तीला कळल्यास ती व्यक्ती त्याची समजूत घालू शकते आणि आत्महत्येपासून परावृत्त करू शकते. सोशल साइटवर अनोळखी असणारे मित्रमैत्रीणसुद्धा समुपदेशनाने अशा व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त होण्यास मदत करतात.