वैद्य अश्विन सावंत हेमंत-शिशिरातील थंडीच्या दिवसांमधला वातावरणामध्ये वाढणारा थंडावा आणि कोरडेपणा आरोग्याला बाधक होतो आणि विशेषत: लहानसहान श्वसनविकारांनी आणि वातविकारांनी लोक त्रस्त होतात. थंडीचा कडाका वाढल्यावर तर घराघरांतून सर्दी- ताप- खोकल्याने लोक ग्रस्त होतात. रोजची औषधे घेऊनही कफ-खोकला काही कमी होताना दिसत नाही. वातविकारांमध्ये सांधे धरणे, दुखणे, आखडणे, पाठदुखी, कंबरदुखी वगैरे समस्या लोकांना त्रास देतात. अशा रुग्णांना स्वेदन चिकित्सा फायदेशीर असते. स्वेदन चिकित्सा म्हणजे घाम आणणारा उष्ण उपचार. आज प्रचलित असलेले सोनाबाथ, स्टीम हे आयुर्वेदीय ग्रंथांनी सांगितलेल्या स्वेदन चिकित्सेचेच आधुनिक प्रकार आहेत. शरीराला घाम येण्याचे आरोग्य जतनामधील महत्त्व लक्षात घेऊन आयुर्वेदाने स्वेदन चिकित्सेला नितांत महत्त्व दिलेले आहे आणि कृत्रिम उपायांनी घाम आणण्याचे विविध उपाय सुचवले आहेत. आजच्या आधुनिक जगात माणूस घाम येऊच नये यासाठी अखंड प्रयत्नात असतो, तो इतका की घाम यावा या हेतूने करायचा व्यायामसुद्धा वातानुकू लित थंड वातावरणाच्या जिममध्ये केला जातो. हे आरोग्याला पोषक तर नाहीच, उलट बाधक आहे. लोकांनी घाम आणण्याचे महत्त्व समजून आपल्या आयुर्वेद चिकित्सक वैद्यांकडून स्वेदन-पंचकर्म करून घ्यावे, विशेषत: हिवाळ्यात आणि पावसाळ्यात! घरच्या घरी पुढील प्रकारे स्वेदन करता येईल. कपडय़ामध्ये मीठ किंवा ओवा घेऊन ती पुरचुंडी तव्यावर गरम करून त्याने शेक, नुसता कपडा तव्यावर गरम करून शेक, गरम पाण्याची वाफ अंगावर घेणे, फडका गरम पाण्यात भिजवून त्याने शेकणे, निखारे किंवा करवंटय़ा जाळून त्याचा धूर घेणे, गरमगरम पाणी पिऊन गरम कपडे, गरम पांघरूण घालून निवांत बसणे, हॉटवॉटर बॅगने किंवा थर्मल पॅडने शेक घेणे, पाणी उकळवून त्यामध्ये एक थेंब तुळशीचा अर्क टाकून त्या पाण्याची गरम वाफ घेणे, सूर्यकिरणांचे सेवन करणे वगैरे. (गरमगरम मुगाच्या खिचडीचे सेवन हासुद्धा एक स्वेदनाचा प्रकार आहे, जो आभ्यन्तर स्वेदनासही उपयोगी पडतो.) प्रामुख्याने कपाळ, गालफडे, नाक, गळा (घसा), छाती, कुशी, पाठ या अवयवांना दिलेला स्वेदन उपचार श्वसनविकारांमध्ये आणि गुडघे, घोटे, पोटऱ्या, कंबर, पाठ वगैरे अंगांना दिलेला स्वेदन उपचार वातविकारांमध्ये उपचारास साहाय्यक म्हणून उपयोगी पडतो आणि रोगप्रतिबंधक म्हणून तर निश्चित उपयुक्त सिद्ध होतो. तुम्ही घेत असलेल्या उपचाराला स्वेदनाची जोड दिलीत तर थंडीचे दिवस बाधणार नाहीत. स्वेदन अर्थात घाम आणण्याची चिकित्सा ही निर्वात जागी अर्थात जिथे वारा वाहत नाही अशा स्थानी आणि अन्नाचे पचन झाल्यावर करावी ही ताकीद शाङ्र्गधर संहिता देते. स्वेदन चिकित्सा ही शरीराला घाम यावा या हेतूने केली जात असल्याने घाम सुकवणारा वारा त्या वेळी अंगावर घेणे योग्य नाही. तस२ही शास्त्राने हिवाळ्यात शरीरावर वारा घेणे स्वास्थ्यास अहितकर सांगितले आहे. विशेषत: अंगावर समोरून येणारा वारा. त्यात पुन्हा शरीरावर वाहता वारा घेणे हे वात वाढवणारे असल्याने आणि स्वेदन ही मुख्यत्वे वातविरोधी चिकित्सा असल्याने स्वेदन निर्वात स्थानी करणे योग्य. अन्न पचल्यावर स्वेदन करावे हे तर योग्यच आहे. स्वेदनामुळे रक्ताचा प्रवाह त्वचेकडे वळतो आणि त्या वेळी जठरामध्ये- आतडय़ामध्ये अन्न असेल तर त्या अन्नाच्या पचनासाठी आवश्यक तो रक्तपुरवठा मिळणार नाही व अन्नपचन व्यवस्थित होणार नाही. एकंदरच अन्नाचे अपचन होऊ नये यासाठी हा सल्ला दिलेला आहे. असे असले तरी विष्टब्धाजीर्ण या वातविकृतीमुळे होणाऱ्या अजीर्णामध्ये (अपचनामध्ये) मात्र स्वेदन चिकित्सा करणे योग्य.