चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसतो. धावपळीत काम करत असताना त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो. ऑफीसमध्ये तासनतास बसताना आपण अनेक चुकीच्या गोष्टी करत असतो. त्यामुळे अचानक आपल्याला कधी अॅसिडीटी होते तर कधी पोट बिघडते. कधी अचानक डोके दुखायला लागते तर काहींचा पोटाचा घेर वाढायला लागतो. अशा कोणत्या चुकीच्या सवयी आहेत ज्यामुळे अनेकांचे वजन वाढते आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येन केन प्रकारे प्रयत्न केले तरीही आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. काय आहेत अचानक वजन वाढण्याची कारणे पाहूयात….

१. दुपारी जेवणाचा डबा घरुन आणला जातो. मात्र ५ नंतर ७ पर्यंत पुन्हा भूक लागते. त्यावेळी ऑफीसच्या आजूबाजूच्या परिसरातून भजी, भेळ, वडापाव असे पदार्थ मागवले जातात. मात्र हे पदार्थ आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

२. ऑफीसमध्ये कामाचा ताण आल्यास अनेक जण उगाचच सतत खातात. मग चिप्स, बिस्कीटे खाणे, विनाकारण चहा, कॉफी पिणे अशा चुकीच्या सवयी लागतात. यामुळे वजन वाढते.

३. काही ऑफीसेसमध्ये सतत काही ना काही ऑर्डर करायची सवय असते. टीममधील एखाद्याला भरीस पाडून विविध पदार्थांची ऑर्डर केली जाते. त्यामुळे भूक नसली तरीही विनाकारण खाल्ले जाते. त्यातही दिवसभराचे काम बसून करायचे असल्याने खाल्लेले अन्न पचत नाही आणि त्याचे चरबीत रुपांतर होते.

४. ऑफीसमध्ये पुरेसा उजेड नसेल आणि अंधारे वातावरण असेल तर अशा वातावरणात सतत काही ना काही खावेसे किंवा प्यावेसे वाटते. त्यामुळे ऑफीसचे वातावरण प्रसन्न आणि प्रकाशमान असणे गरजेचे आहे.

५. कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने किंवा मीटिंग आणि इतर गोष्टींमुळे खाण्यापिण्याच्या वेळा चुकतात. अशाप्रकारे वेगवेगळ्या वेळेला खाल्ल्यामुळे वजन वाढते.