डॉ. संजीवनी राजवाडे नुकतेच आपल्या आयुष्यातून २०२० हद्दपार झाले. संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या करोनाचा फटका कोटय़वधी नागरिकांना बसला. त्यामुळे नव्या वर्षांकडून खरं तर खूप अपेक्षा आहेत. नववर्षी आशा-आकांक्षांचे, शांततेचे, आरोग्याचे, आर्थिक स्वातंत्र्याचे पंख लावून गगनभरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले अनेक जण मनाची मरगळ झटकण्याचा प्रयत्न करणार आहेत. हळूहळू उद्योग, कार्यालये, नोकऱ्या, शाळा-महाविद्यालये, प्रवास सुरक्षित होईलही, परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. एरवी आपण नेहमीच नव्या वर्षी एखादी नवी संकल्पना मनाशी ठरवून त्याची पूर्तता पुढील संपूर्ण वर्षभरात करण्याचा प्रयत्न करीत असतो. कधी कधी या संकल्पना आपल्याला जड वाटतात, कधी अवघड तर कधी न जमू शकणाऱ्या. कधी कधी त्याकडे दुर्लक्ष होतं, तर कधी आपल्यालाच कंटाळा येतो. कोविडपासून स्वत:ला वाचवणे आणि कोविडला बळी पडल्यास थोडक्यातच बचावणे हा प्राथमिक संकल्प आपल्या प्रत्येकाचा असावा. कोविडशिवाय असणारे इतर आजार पण आपल्यापासून दूर राहावेत, व्याधीनिहाय कमीत कमी डोसची औषधे लागू पडावीत आणि नुसतेच आयुर्मान न वाढता आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढावी. अशा दृष्टीने हे नवे वर्ष आपल्यासाठी ‘आरोग्य संकल्प पूर्ति वर्ष’ असे असावे. सकारात्मक बदल : ’ आपली सकाळची नाश्त्याची वेळ निश्चित करून त्या वेळी कोणतेही एक सूप घ्यायचे आहे. कोणत्याही २ ते ३ भाज्या आणि डाळी/ मोड आलेली कडधान्ये/ पनीर/ अंड / चिकनचे पाणी वापरून सूप तयार करावे. यामध्ये काळ्या मिऱ्याची पूड व दालचिनी घालावी. इतर वस्तू आवडीनुसार घालता येतील. या सूपमुळे ऊर्जा मिळेल, पोट भरेल, द्रवपदार्थ पोटात जाईल. तसेच तंतुमय पदार्थाचा, प्रथिनांचा पुरवठा शरीरास होईल. सध्याच्या करोनाच्या काळात असे सूप सर्दी-घसादुखी-श्वासावरोध यांसाठी उपयुक्त ठरेल. तसेच नियमित सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्यास नक्की मदत होईल. ’ दुपारचे जेवण व नाश्ता यामध्ये निदान चार तासांची वेळ ठरवा आणि ती पाळा. अधे-मध्ये काही खाणे टाळावे. जेवणात एकदल धान्य, द्विदल धान्य, भाज्या, कोशिंबिरी घ्यावी. सर्व पदार्थ तयार करण्यास वेळ नसेल तर या पदार्थाचे कॉम्बिनेशन असलेले पदार्थ घेण्यास हरकत नाही. ’ रोज वरीलप्रमाणे वेळा व पदार्थ खाताना त्यात १ ते २ छोटे चमचे साजूक तूप घालायला सुरू करावे. ज्यांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, अशांनी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे. ’ आठवडय़ातून फक्त एकच दिवस गोड पदार्थासाठी ठेवा (लाडू, बर्फी, श्रीखंड, चॉकलेट, आईस्क्रीम इत्यादी). एरवी चहातील साखर/ नैवेद्याचे गोड घेता येईल. त्यानंतर हा परिपाठ नेहमीसाठी अंगीकारल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येईल. तीळ+ शेंगदाणे+ जवस+ सुके खोबरे यांची चटणी रोजच्या आहारात घ्यावी. यातून उपकारक स्निग्ध पदार्थाचा तसेच कॅल्शियम, मॅग्निशियम, फॉस्फरस या मूलद्रव्यांचा व प्रथिनांचा शरीरास पुरवठा होतो. ज्यायोगे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व कार्यशक्तीदेखील वाढते. आहारात पातळ ताकाचा पुरेसा वापर करावा आणि मधल्या वेळी भूक लागल्यास ताजी फळे घ्यावी. दिवसातून आपल्या प्रकृतीनुसार आणि वयानुसार योग्य असा व्यायाम किमान ४० मिनिटे करावा. चालणे, धावणे, योगासने, नृत्य, सूर्यनमस्कार इत्यादी कोणत्याही शारीरिक हालचालींची सवय करून घेणे अत्यावश्यक आहे. यात दीर्घश्वसन पण समाविष्ट करावे. ’ दोन्ही नाकपुडय़ांमध्ये खोबरेल तेलाचे दोन-दोन थेंब अवश्य घालावे. याने बाहेरील जंतूंचा संसर्ग होण्यास प्रतिबंधात्मक कारवाई होते. तसेच सायनसमधील कफाचा चिकटा कमी होण्यास फायदा होतो. ’ कोमट पाणी+ हळद+ मीठ+ खाण्याचे तेल (पाव चमचा ) हे मिश्रण तोंडात धरावे. जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवून नंतर थुंकून टाकावे. याने तोंडातील जिवाणूंचा नाश होऊन हिरडय़ा, जीभ, दात, गालाचा आतील भाग यांचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. ’ मुखपट्टीचा योग्य वापर करावा तसेच स्वत:चे सॅनिटायझर स्वत: वापरावे. ’ आता या सगळ्या गोष्टींना जोड द्यायची आहे ती छंदाची. कोणताही आवडीचा छंद सुरू करावा. दिवसातून यासाठी एक तासाचा वेळ अवश्य द्यावा. एकमेकांशी संवाद साधावा. मनावरील ताण-तणाव कमी होऊन ताजेतवाने होण्यासाठी हा संकल्प अतिशय महत्त्वाचा. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपताना अनेक व्याधींपासून मुक्तता तर मिळेलच शिवाय आपले आरोग्य व सौंदर्य यांमध्येही नक्की भर पडेल. कोविडचे लसीकरण सुरू होईल, तेव्हा करून घेता येईलच; पण त्यानंतरही आपली लढाई व लढाऊ सैन्य जोशात ठेवणे यासाठी हे आरोग्य संकल्प. काळजी * वाफेचा/ वाफारा घेण्याचा अतिरेक करू नये. वाफ घेताना डोळे उघडे ठेवू नयेत. * आरोग्यवर्धक काढे, सॅनिटायझर इत्यादी गोष्टींचा अतिरेक टाळावा. * सकाळी थंड हवेमध्ये शक्यतो फिरू नये. * जंक फूड व तळकट पदार्थाचे सेवन सतत व अति प्रमाणात करू नये. * संगणक/ टीव्ही/ मोबाइल यांच्या पडद्यासमोर सतत बसू नये. * चुकीचा व्यायाम अथवा व्यायामाचा अतिरेक करू नये. * बाहेरून आणलेल्या वस्तू- भाज्या, फळे, कपडे यांचा तात्काळ वापर किंवा सेवन करू नये. धुऊन घ्यावे. dr.sanjeevani@gmail.com