वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. यंदा ५ जून रोजी वटपौर्णिमा आहे. वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे . अशी मान्यता आहे की , ह्या व्रताने पतीवरील संकटे दूर जातात, आणि पतीला दिर्घआयुष्य लाभते. या व्रताने वैवाहिक जीवनातील अडीअडचणी ही दूर होतात. या दिवशी सावित्री आणि सत्यवानाचे कथा ऐकण्याची ही प्रथा आहे. स्कंद आणि भविष्य पुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. या व्रताची तिथी ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा आहे, या व्रतात सर्वात महत्वाचे स्थान हे वटवृक्षाचे म्हणजे वडाच्या झाडाचे असते. असते मानले जाते की याच वडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. हिंदू पुराणनांनुसार वटवृक्षाच्या मुळांमध्ये ब्रम्हदेव स्थित असतात, खोड आणि फांद्यांमध्ये विष्णू असतात, आणि शेंड्यांमध्ये भगवान शंकर स्थित असतात. अश्या या दैव गुणी वृक्षाच्या छायेखाली साधना, व्रत केल्यास, दुःख दैन्य दूर होते, आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या वृक्षाची षोडषोपचार पूजा करून , या वृक्षाला सूत किंवा धागा बांधण्याची प्रथा आहे. चणे, गूळ , आणि फळांचाही नेवैद्य दाखवला जातो. वटपूजनाचा मुहूर्त – पौर्णिमा प्रारंभः ५ जून २०२० रोजी उत्तर रात्रौ ३ वाजून १५ मिनिटे. पौर्णिमा समाप्तीः ६ जून २०२० रोजी रात्री १२ वाजून ४२ मिनिटे कोरोनामुळे सुवासिनींनी घराबाहेर न पडता प्रत्यक्ष वटपूजना-ऐवजी यंदा वडाचे चित्र काढून घरातच पूजन करावे. शुक्रवारी माध्यान्हापर्यंत दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत घरी वटपूजन करता येईल.