उन्हाळ्यात पाचक अग्नी फार मंद असतो म्हणून सकाळी जेवणात जड, पाच्य व अजीर्णकारक पदार्थ मुळीच खाऊ नयेत. उन्हाळ्यात जेवण कमीच जातं. पाणी पिण्याकडेच जास्त कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात तसेच त्या कशा कराव्यात याविषयीची थोडक्यात माहिती. दुधीभोपळा – सर्व ऋतूंतील आणि सर्व वयांतील लोकांना चालणारी ही भाजी. खूप पथ्यकारक आहे. पचायला सोपी आणि कोणत्याही व्याधीत खाऊ शकतो. हृदयविकारात अतिशय उपयोगी. गवार – उन्हाळ्यात गवार खाल्ल्यानंतर काही जणांना पित्ताचा त्रास होतो. कारले – कारले कडू, पण पथ्यकारक. कोबी, प्लॉवर – उन्हाळ्यातच नव्हे तर अन्य ऋतूंतही बऱ्याच जणांना खाल्ल्यानंतर वाताचा त्रास होतो. भेंडी – मूतखडय़ाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात खावी. भाज्या बनवताना घ्यावयाची काळजी - भाज्यांना तेल कमी प्रमाणात वापरावे, त्याचप्रमाणे मसाल्यांचा वापरही कमी असावा. - भाजी ताजी असावी (बनवताना), तसेच भाजी बनवल्यानंतर ताजी असतानाच खावी. - उन्हाळ्यात गरम मसाल्यांचा वापर कमीतकमी करावा. - भाज्यांमध्ये आमसूल वापरावे, खूप जास्त पाण्यात भाज्या शिजवू नयेत. - भाज्या डाळ घालून शिजवाव्यात. भाज्यांचे सूप बनवावे. - भाज्या खाताना लिंबू जरूर वापरावे, जिरेपूड, धणेपूडचा वापर भाज्यांमध्ये करावा. - भाज्या खूप दिवस फ्रिजमध्ये ठेवू नये. - मिठाचा वापर आवश्यकतेनुसार करावा, जास्त प्रमाणात मीठ वापरू नये. - डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ dr.sarikasatav@rediffmail.com