अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी रोज मूठभर अक्रोड सेवन करणे आवश्यक आहे, असे भारतीय अमेरिकी वैज्ञानिकाने म्हटले आहे. अक्रोडमध्ये अॅण्टी ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात. अक्रोड हा ड्रायफ्रूटचा एक प्रकार आहे. याबाबतचा शोधनिबंध अजून प्रकाशित झालेला नाही. त्याआधीच न्यूयॉर्क स्टेट इन्स्टिटय़ूट फॉर बेसिक रीसर्च इन डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज या संस्थेच्या डॉ. आभा चौहान यांनी ही माहिती देताना सांगितले की, वयाच्या पासष्टीतील दहापैकी एका व्यक्तीस अल्झायमर झालेला असतो, पण या आजाराबाबत जागरूकता कमी आहे. या आजाराची लक्षणे कळण्यास दहा वर्षे लागतात व यात स्मृतिभ्रंश होत असतो. ऑक्सिडेटिव्ह हानी व इन्फ्लमेशन ही या रोगाची दोन प्रमुख लक्षणे आहेत. अक्रोडमध्ये अॅण्टीऑक्सिडंट भरपूर असतात. त्यामुळे त्यांचे सेवन गरजेचे आहे. भारतातही वृद्धांची संख्या वाढत आहे त्याबरोबर अल्झायमरचे प्रमाणही वाढले आहे. २००१च्या गणनेनुसार भारतात साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ७० दशलक्ष लोक आहेत. दर पाच वर्षांला या आजाराचे रुग्ण दुप्पट होतात. भारतात २०१० मध्ये ३.७ दशलक्ष लोकांना हा रोग होता. २०३०पर्यंत या रुग्णांची संख्या दुप्पट होईल. त्या काळात भारतातील अनेक वृद्धांना अल्झायमर झालेला असेल. या आजारात मेंदूत अमायलॉइड बीटा प्रोटिनचे थर मेंदूत तयार होतात. या आजारावर अक्रोड गुणकारी असल्याचे दिसून आले आहे. (टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)