खूप जास्त पाणी पिण्याने मेंदूत जास्त अर्धद्रवपदार्थ साठून सूज येऊ शकते, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. त्यांच्या मते मेंदूत पाणी साठल्याने रक्तातील सोडियमची पातळी घातक पातळीवर कमी होते. त्यामुळे हायपोनॅट्रेमिया होतो. यात मेंदूला सूज येऊन वेदना होतात. मॅकगील युनिव्हर्सिटी सेंटरच्या चमूने म्हटले आहे की, कॅनडाने मेंदूतील परिणामांचे कोडे सोडवले असून अति पाणी पिण्याने मेंदूवर वाईट परिणाम होत असतो. ‘जर्नल सेल रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून हायपोनॅट्रेमिया या अवस्थेत मेंदूची हानी होत असल्याचे त्यात म्हटले आहे. हायड्रोमिनरल व फ्लुईड इलेक्ट्रोलाइट होमिओस्टॅसिस या प्रक्रियांचा अभ्यास यात करण्यात आला, असे चार्लस बोर्क यांनी म्हटले आहे. वृद्ध लोकांमध्ये हा परिणाम दिसून येतो. त्यात नंतर काही प्रमाणात मेंदूतील भागांना छेद जाऊन बोधनात्मक समस्याही निर्माण होतात. यात मेंदूच्या जलसंवेदन प्रक्रियेत बिघाड झालेला असतो. जास्त पाणी सेवन केल्याने टीआरपीव्ही ४ हा पेशी द्वारपाल कार्यान्वित होतो. यात हा घटक ग्लायल पेशींच्या कॅल्शियम मार्गिकात असतो. जलसंवेदनाशी संबंधित न्यूरॉनभोवती त्याचे अस्तित्व असते. जलसंवेदनाचे काम बिघडल्याने मेंदूत जास्त अर्धद्रवपदार्थ साठत जाऊन हानी होते. टॉरिन या अमायनो अॅसिडचे काम बंद पडले की जलसंवेदन प्रणाली बंद पडते व त्यामुळे घातक परिणाम मेंदूत दिसून येतात.