गरम मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्र म्हणजे भारत. त्यामुळे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या स्वयंपाक घरामध्ये गरम मसाल्याचे पदार्थ हमखास आढळतात. जेवणाची चव वाढविणाऱ्या या पदार्थांपैकी काहींचा वापर आजीबाईच्या बटव्यासाठीही केला जातो. त्यामुळे चवीसोबतच हे पदार्थ गुणकारी असल्याचं दिसून येतं. मसाल्याच्या पदार्थांमध्ये महत्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे चक्रीफूल. चक्रीफूल केवळ मसाल्याची चव वाढवत नसून त्याचे अन्यही काही गुणधर्म आहेत. इशा त्यागी यांनी चक्रीफूलाचे काही गुणधर्म सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे - १. वाढत्या वयाची लक्षणं थांबविण्यासाठी - वय वाढायला लागलं की त्याच्या खुणा चेहऱ्यावर आपोआप दिसू लागतात. त्यामुळे अनेक वेळा तरुणी किंवा महिला प्रसाधनांचा वापर करुन वाढत्या वयाच्या खुणा लपविण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपल्या आहारात समावेश केलेल्या पदार्थांमुळेदेखील ही समस्या टाळता येऊ शकते. रोजच्या जेवणामध्ये वापरण्यात येणाऱ्या मसाल्यामध्ये चक्रीफूल हे महत्वाचं काम करत असतं. चक्रीफूल वाढत्या वयाच्या खुणा लपविण्याचं काम करतं. यामध्ये व्हिटामिन 'ए' आणि 'सी'चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतात. त्यासोबतच त्यात अॅटी ऑक्सिडेंटचे गुणही असतात. चक्रीफुलामध्ये शरीरातील फ्री रेडिकल्सला नियंत्रणात आणण्याची क्षमता असते. त्यामुळे वाढत्या वयाची लक्षणं रोखण्याचं काम चक्रीफूलामध्ये असते. २. सर्दी-खोकल्यावर गुणकारी - कोणत्याही ऋतूमध्ये होणारा आजार म्हणजे सर्दी आणि खोकला. काही जणांना थंड पदार्थांचं सेवन केल्यानंतरही लगेच सर्दी-खोकल्याची समस्या निर्माण होते. अशावेळी चक्रीफूल हे फायदेशीर ठरते. चक्रीफूलमध्ये थाइमो आणि एथोल याचे गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी किंवा खोकल्यावर चक्रीफूल गुणकारी आहे. त्यासोबतच शरीरामध्ये उष्णता वाढविण्याचं काम चक्रीफूल करते. ३.पचनक्रिया सुधारते- उशीरा जेवण झाल्यामुळे किंवा एखाद्या वेळी चुकीचे पदार्थ खालल्यामुळे अनेक वेळा अपचन, पोटात गॅस होणे, पोटदुखी या सारख्या समस्या निर्माण होता. मात्र या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चक्रीफूल फायदेशीर ठरते. चक्रीफूलामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे आपल्या आहारात चक्रीफूलाचा समावेश करायला हवा.