व्हॉट्स अॅपवर पसरवण्यात येणाऱ्या अफवांना व चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न केंद्र सरकारनं इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीला विचारला होता. व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात सरकारकडे खुलासा केला असून हिंसेच्या अघोरी घटनांनी आम्हीदेखील व्यथित झाल्याचं म्हटलं आहे. तसेच या समस्येवर लगेच काहीतरी तोडगा काढावा अशी आमचीही इच्छा असल्याचं व्हॉट्स अॅपनं सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

चिथावणीखोर मेसेजेसमुळे केंद्र सरकारचा व्हॉट्सअॅपला इशारा

केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याला पाठवलेल्या पत्रात व्हॉट्स अॅपनं म्हटलंय की हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्या, समाज व सरकार या सगळ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज आहे. व्हॉट्स अॅपवर अत्यंत बेजबाबदार मेसेजेस पाठवण्यात येतात, अफवा पसरवण्यात येतात तसेच चिथावणीखोर मेसेज पाठवले जातात, त्याविरोधात तातडीनं कारवाई करावी असं सरकारनं व्हॉट्स अॅपला सांगितलं होतं. सुरक्षेला प्राध्यान देताना कुणालाही एका बटण दाबण्यानं ब्लॉक करता येतं असं व्हॉटसअॅपनं म्हटलं आहे. चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणून व्हॉट्स अॅपच्या ग्रुपमध्ये नवीन काही फीचर्सही अॅड करण्यात आली असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच ग्रुप सोडून गेलेल्याला परत अॅड करता येणार नाही असं फीचरही देण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

सोशल मीडियाचा भस्मासूर!

कुठल्या सदस्याला मेसेज पाठवता येतील याचे अधिकार अॅडमिनला देणारं फीचर अॅड करण्यात आलं आहे, त्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा घालणं शक्य होईल असा दावाही कंपनीनं केला आहे. व्हॉट्स अॅपनं असंही नमूद केलंय की, मेसेज फॉरवर्ड केलाय की स्वत: पाठवलाय हे दाखवणारं फीचरही अॅड करण्यात आलं आहे.