रिमझिम पाऊस.. मातीचा सुगंध.. अधूनमधून वाहणारे वारे आणि अशा अशा वातावरणात खरपूस भाजलेल्या मक्याच्या कणसावर लिंबू, तिखट मसाला पेरून खाण्याची मजा काही औरच! मक्याचे कणीस खाण्याचे बरेच आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. मात्र योग्य पद्धतीने मका न खाल्ल्यास शरीराला त्याचे तोटेही आहेत. मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामागची कारणं आणि नेमकं पाणी कधी प्यावं हे जाणून घ्या. पचनसंस्थेवर होतो परिणाम मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो. मग ते तुम्ही भाजून खात असाल किंवा मग उकडून. त्यावर लगेच पाणी पिऊ नका. मक्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ते खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो. पाण्यामुळे फायबर पचण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. गॅसची समस्या मक्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्च अधिक प्रमाणात असते. हे घटक पाण्याशी मिसळताच गॅस निर्माण करतात. यामुळे मका खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटात गॅस होऊ शकतो. परिणामी अॅसिडिटी, पोट फुगणे अशा समस्या सतावू लागतात. कधी पाणी प्यावे? मक्याचे कणीस खाण्याआधी भरपूर पाणी पिऊ नका आणि खाल्ल्यानंतर पण लगेच पिऊ नका. मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर ४५ मिनिटांनी पाणी प्या. तसेच मक्याचे कणीस खाण्याआधी अर्धा तास पाणी प्या. त्यामुळे आरोग्याला कोणतेही नुकसान होणार नाही.