हिवाळा हा खरे तर सुखद ऋतू. पण या दिवसांत तापमान एकदम कमी होऊ लागल्यावर त्वचा आणि ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे, केस कोरडे पडणे या गोष्टी होतातच. जशी आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालण्याची काळजी घेतो, तशीच त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे आहे. * थंडीत त्वचेतला वात वाढतो आणि त्यातील ओलावा, स्निग्धपणा कमी होतो. कोरडय़ा पडलेल्या त्वचेमुळे दिवसा आणि रात्रीही त्वचेला कंड सुटतो, त्वचेला स्पर्श केल्यावर ती रखरखीत आणि ओबडधोबड लागते. त्वचा आणखीनच कोरडी पडली तर त्याची सालपटे निघू शकतात, खासकरून टाचांना भेगा पडतात, काहींची त्वचा खूप कोरडी आणि कडक होऊन ती खवल्यांसारखी दिसू लागते. * काही जणांमध्ये या दिवसांत त्वचेला येणारी खाज तर इतकी प्रचंड असते, की त्या ठिकाणी खाजवून ओरखडे पडतात आणि रक्तही येते. अशा पद्धतीने खाजवून झालेली जखम दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या इसबमध्ये परिवर्तित होणे आणि जास्तच त्रासदायक ठरू शकते. * चेहरा थंडीमुळे उलतो. ओठावर आणि ओठाभोवतीही भेगा पडतात. कधी कधी ओठ फुटल्यामुळे खाताना किंवा बोलताना तोंड उघडल्यावर ओठांना चिरा पडून रक्त येते. अशा वेळी आपण नकळत सारखे ओठाला दात लावतो, ओठ ओले करण्यासाठी त्यावरून जीभ फिरवतो. हा उपाय ओठांच्या विरोधातच जातो! तोंडातील लाळेचा ‘पीएच’ हा ‘अल्कलाइन’ असतो. शिवाय त्यात काही पाचकरसही असतात. ओठ सतत लाळेच्या संपर्कात आल्याने ते आणखी विसविशीत होतात, आणखी फुटतात. * बोचऱ्या थंडीमुळे चेहऱ्यावर कोरडेपणाचे डाग पडतात. त्वचेवर सतत मुलतानी मिट्टी लावून ठेवल्यासारखे खेचल्यासारखे वाटते. त्वचेतून स्निग्धता आणि पाणी उडून गेल्यामुळे त्वचेवरून प्रकाश परावर्तित होऊ शकत नाही आणि त्वचा निस्तेज दिसायला लागते. हे सगळे असे होऊ नये म्हणून त्वचेची सातत्याने काळजी घेणे, निगा राखणे गरजेचे आहे. काही टिप्स * आंघोळीसाठी गार पाणी तर नकोच, पण खूप गरम पाणीही वापरू नये. त्याने त्वचा कोरडी पडते. कोमट वा मध्यम तापमानाचे पाणी वापरणे चांगले. * आंघोळीच्या वेळी किंवा तोंड धुतानाही साबण, फेस वॉश किंवा अगदी बेसन पिठाचाही कमीतकमी वापर करणे बरे. उन्हाळ्यात अनेकांना स्क्रबर आणि शॉवर जेल वापरून आंघोळ करायला आवडते. थंडीत स्क्रबरने त्वचा घासणे नक्कीच टाळावे. * आंघोळीनंतर टॉवलेने त्वचा खसाखसा पुसू नये. ओलसर त्वचेवरच चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर, चक्क शेंगदाणा तेल लावावे. बाजारात नेहमी मिळणारी मॉइश्चरायझर आपल्या त्वचेस चालतील की नाही अशी शंका असल्यास त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्यांनी सांगितलेली मॉइश्चरायझर किंवा ऑइंटमेंट लावावीत. * वातानुकूलित यंत्रणेचा वापर कमीतकमी करावा. तासंन्तास एसीत बसणे टाळावे. * आहारात ‘ओमेगा ३ फॅॅी अॅसिड्स’ असलेल्या नैसर्गिक पदार्थाचा जरूर वापर करावा. या पदार्थामध्ये मेथीचे दाणे, अक्रोड, जवस, उडीद, राजमा, मासे अशा पदार्थाचा समावेश होतो. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी पिणेही गरजेचे. डॉ. प्रसन्न गद्रे