आपला आहार चांगला असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. परंतु सध्या अन्नघटकांध्ये होत असलेली भेसळ, त्याचा दर्जा आणि फास्टफूडचे वाढते प्रमाण यांचा आपल्या आहारावर अतिशय वाईट परिणाम होताना दिसतो. सुपरफूड हे परदेशातच मिळते असा आपला समज असतो. मात्र भारतीय अन्नपदार्थांमधील घटक आरोग्याला उपयुक्त असतात. परंतु त्यांची योग्य ती माहिती नसल्याने आणि बाहेरचे चटकमटक खाण्याची सवय असल्याने आपण आहाराकडे योग्य पद्धतीने लक्ष देत नाही. भारतीय अन्नातील सॅलेडस, कडधान्ये, भाज्या आणि मसाल्यांच्या पदार्थातील बरेच पदार्थ आरोग्य उत्तम राहण्यासाठी उपयुक्त असतात. पण असे नेमके कोणते पदार्थ आहेत ज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे आवश्यक आहे हे समजून घेऊया…

बीट

बीट हा सॅलडमधील आरोग्याला अतिशय उपयुक्त असणारा पदार्थ आहे. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, लोह असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असते. याच्या अतिशय आकर्षक अशा रंगाबरोबरच त्याचे शरीरासाठी अनेक फायदे असतात. यामध्ये बेटाईन आणि फॉलेट हे घटकही असतात जे हृदयविकारासारख्या विकारांवर उपयुक्त ठरतात. याबरोबरच बीटमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, बी ६ आणि सी असतात. याशिवाय यामध्ये कार्बोहायड्रेटस, अँटिऑक्सिडंटस आणि प्रोटीन्सही असतात.

कोबी

अनेकांना कोबीची भाजी आवडत नाही. कोबी असेल तर बरेच जण डबाच खाणे टाळतात. कोबीमुळे गॅसेस होतात असाही अनेकांचा समज असतो. मात्र कोबीमध्ये सल्फोराफेनसारखे आरोग्याला अतिशय आवश्यक असे घटक असतात. यामुळे पेशींना कोणतीही समस्या उद्भवण्यापासून त्यांचे रक्षण होते. तसेच कर्करोगाला कारणीभूत असणारे अनेक घटक मारण्याचेही काम कोबीव्दारे केले जाते. यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी १, फोलेट आणि तांबे या घटकांचे प्रमाण जास्त असते.

पेरु

पेरु म्हणजे अमृत आहे असे म्हटले जाते. यामध्ये कर्करोगाशी सामना करणारे अँटिऑक्सिडंटस असतात. यामध्ये टोमॅटो आणि कलिंगड याहून जास्त लायकोपीन असते. पेरुमध्ये शरीराला आवश्यक असणारे लाल रंगद्रव्यही जास्त प्रमाणात असतात. त्याचे शरीराला होणारे फायदे निश्चितच कमी नसतात.