भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तीळ या पदार्थाला अत्यंत महत्त्व आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील तीळगुळाचा लाडू केला जातो. पांढरे आणि काळे असे तीळाचे दोन प्रकार असतात. तीळ हे उष्ण असून खासकरुन हिवाळ्यात त्याचे लाडू, चटणी केली जाते. तसंच आळूवडी, कोथिंबीरवडी किंवा ढोकळा अशा पदार्थांवर तीळाची खमंग फोडणीदेखील दिली जाते. तीळ खाण्याचे अनेक फायदे असून त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात. १. अनेकांना हिवाळ्यात थंडी सहन होत नाही. अशा वेळी अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहते. २. अनेकांची त्वचा ही कोरडी असते, अशा व्यक्तींना आहारात तीळाचा समावेश करावा. तीळामुळे त्वचेचा पोत सुधारतो. ३. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा उष्णतेचे विकार आहेत. त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावे. ४. तीळ पचण्यास जड आहेत. त्यामुळे भाकरीला तीळ लावून ते खावेत. ५. तीळाच्या कुटाचा भाजीतदेखील वापर केला जातो. अनेक ठिकाणी दाण्याच्या कुटाला पर्याय म्हणून तीळाचा कुट वापरला जातो. ६. मासिक पाळीत ज्या महिलांना रक्तस्त्राव कमी होतो त्यांनी तीळाची चटणी खावी. ७.बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. यामुळे पुरेसे दूध येण्यास उपयोग होतो. ८. ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते. ९. दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. १०. केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)