नवी दिल्ली : उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये लसणाचा वापर करणे आवश्यक असते. लसणामध्ये अनेक आरोग्यदायी गुण असतात, ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहू शकते. सकाळी रिकाम्या पोटी जर लसूण खाल्ला तर ते आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे संशोधन नुकतेच करण्यात आले आहे. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम लसूण करतो, तसेच त्यामध्ये पचनसंस्था सुधारण्याचे आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याचेही गुण आहेत, असे संशोधकांनी सांगितले. लसूण तिखट असल्याने रिकाम्या पोटी तो खाल्ल्याने तोंडात जळजळ होईल, मात्र त्यामध्ये जीवाणूविरोधी आणि पाचक गुण असल्याने त्याचा शरीरास फायदा होतो. दररोज दोन ते तीन लसणाच्या पाकळय़ा रिकाम्या पोटी खाल्ल्या तर उच्च कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे हृदयविकाराची समस्या उद्भवणार नाही, असे संशोधकांकडून सांगण्यात आले. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही सुधारते. शरीरातील दाहकता कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम लसूण करतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचेही काम लसूण करतो. वजन कमी करण्यास मदत रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळय़ा खाल्ल्याने वजन घटण्यास मदत होते. लसणामुळे अतिरिक्त चरबी कमी होते, त्याशिवाय लसणामुळे उष्मांकाचे जलदगतीने ज्वलन होते.