नवी दिल्ली : उन्हाळय़ात मूत्रविसर्जन करताना बऱ्याचदा जळजळ होते. अल्पकाळ टिकणाऱ्या या त्रासाला ‘उन्हाळे लागणे’ असेही म्हणतात. जर ही जळजळ दीर्घकाळ राहिली तर मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यामागील नेमके कारण समजून घ्यावे. तज्ज्ञांच्या मतानुसार मूत्रमार्गात जिवाणू संसर्ग, सूज आणि पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यास हा त्रास उद्भवतो. या त्रासाची इतरही अनेक कारणे आहेत. ती अशी : मसालेदार आणि कोरडे अन्न खाल्ल्याने व पुरेसे पाणी न प्यायल्याने हा त्रास होऊ शकतो. दुचाकीवरून दीर्घकाळ प्रवास केल्यावरही हा त्रास उद्भवू शकतो. पहिल्यांदा केलेले भोजन पचण्याआधीच अन्नसेवन केल्यासही मूत्रमार्गातील जळजळीचा त्रास होतो. अतिमद्यपानाचे जसे इतर दुष्परिणाम आहेत, तसेच यामुळे मूत्रमार्गात जळजळ होऊ शकते. उन्हाळय़ात पचनशक्ती मंदावल्याने भूक कमी होते. खाण्यात काही कुपथ्य झाले की पोट बिघडते. त्यामुळे लघवीच्या तक्रारीही वाढतात. आतडय़ात ‘ई- कोलाय’ जिवाणू असतात. पोट बिघडते, तेव्हा हे जिवाणू उपद्रवी बनतात. त्यांनी उत्सर्जित केलेल्या विषारी द्रव्यांचा मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. हा त्रास थांबवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहेच. माठातले वाळय़ाचे पाणी प्यावे. शहाळय़ाचे पाणीही हा त्रास थांबवण्यासाठी उत्तम आहे. शुद्ध नीरा, लिंबू-पाणी, किलगडाचा रसही उपयुक्त ठरतो. जळजळीसह काहींना लघवीतून रक्त जाण्यासारखे लक्षण दिसत असले, तर त्यामागे इतर कारणेही असू शकतात. त्यासाठी डॉक्टरांकडे जावे. मूत्रमार्गाचा संसर्ग असल्यास त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील.