खबरदारी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन पुणे : करोनातून बरे झालेल्या तरुण रुग्णांमध्ये रक्तदाब आणि हृदयविकाराची लक्षणे दिसण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या तरुणांनी कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. छातीत दुखणे, चक्कर येणे, डोके दुखी या गोष्टी सर्वसाधारण आहेत, असे वाटले तरी ही लक्षणे सतत दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे. पुण्यातील मणिपाल रुग्णालयाच्या कोलंबिया एशिया रुग्णालयात नुकतेच एका ३५ वर्षीय तरुणाला हृदयाच्या गंभीर दुखण्यातून जीवदान मिळाले. सदर तरुण नुकताच करोनातून बरा झाला होता. चक्कर येणे, छातीत तीव्र वेदना आणि कमी झालेला रक्तदाब यांमुळे तो पुन्हा बाह्य़रुग्ण विभागात तपासणीसाठी आला असता हृदयविकाराचा तीव्र झटका त्याला येऊन गेल्याचे निदान झाले. त्यानंतर के लेल्या चौकशीमधून सदर रुग्णाने दोन दिवस छातीतील वेदनांना अॅसिडिटी समजून स्वत:च्या मनाने औषध घेतल्याचे समोर आले. तातडीने त्याची अँजिओग्राफी केली असता प्रमुख धमनीमध्ये सुमारे १०० टक्के अडथळे असल्याचे स्पष्ट झाले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद नरखेडे म्हणाले, की करोनातून बरे झाल्यानंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात अशा कारणांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या तरुणांची संख्या ही चिंतेची बाब आहे. आट्रिअल थ्रॉम्बॉसिस या आजारामुळे धमनीमध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यातून प्रमुख अवयवांना होणाऱ्या रक्तपुरवठय़ात अडथळे निर्माण होण्याचा किं वा रक्तपुरवठा थांबण्याचा धोका असतो. सदर रुग्णामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या मोकळ्या करण्यासाठी अँजिओप्लास्टी के ली. त्या वेळी सुमारे १०० टक्के रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठींचे अडथळे असल्याचे दिसून आले. करोनातून बरे झाल्यानंतर रक्तदाब, हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमधील अनेक तरुण रुग्ण हे बैठे काम करणारे आहेत. आहारविहाराच्या सवयी सदोष आहेत. तसेच नियमित व्यायामही के ला जात नाही, असे दिसून येते. गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी करोनातून बरे झाल्यानंतरही चौरस आहार, डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका पण नियमित व्यायाम या बाबी अनिवार्य आहेत. -डॉ. प्रमोद नरखेडे, हृदयरोगतज्ज्ञ