दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. फराळासोबतच मिठाई आणि चॉकोलेट्स समोर आल्यानंतर आपल्याला जिभेवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत खाण्यावर मर्यादा ठेवता न आल्यामुळे गरजेपेक्षा जास्त पदार्थांचं सेवन केलं जाऊ शकतं. अशा अतिखाण्याचे दुष्परिणाम आरोग्यावर दिवाळीनंतर दिसू लागतात. फराळ, मिठाई, चमचमीत जेवण यामुळे पित्त, अपचन, वात तसेच वजन वाढणे, सुस्ती येणे, चरबी वाढणे अशा शारिरीक तक्रारी उद्भवतात. दिवाळीतील अतिखाण्यामुळे होणाऱ्या शारिरीक तक्रारी टाळण्यासाठी अनेकजण ‘डिटॉक्स’ करतात. म्हणूनच की काय, दिवाळीनंतर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नागरिक दिवाळीपूर्वीच खबरदारी घेऊ लागले आहेत. ‘डिटॉक्स प्लॅन’ बनवून घेण्यासाठी आहारतज्ज्ञ, आयुर्वेद-पंचकर्म तज्ज्ञ, वेलनेस सेंटर येथे दिवाळीनंतरच्या सल्ल्यांसाठी दिवाळीआधीच नोंदणी करायला नागरिकांनी सुरुवात केली आहे. तुम्हीही जर दिवाळीनंतर अतिसेवनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी डिटॉक्स डाएट करणार असाल तर लवकरात लवकर तुमच्या डाएटसाठी आहारतज्ज्ञांकडे अपॉईंटमेंट घ्या. कारण कदाचित दिवाळीनंतर तुम्हाला अपॉईंटमेंटसाठी प्रतिक्षा करावी लागू शकते.