‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेता आणि टेलिव्हिजन स्टार राम कपूर यांना कोण ओळखत नाही? उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला हा अभिनेता सध्या नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप सीझन २’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. याच शोदरम्यान त्याने आपल्या आयुष्यातील कधीही कोणाला माहिती नसलेल्या गुपितांचा खुलासा केला. अशाच एका गुपिताच्या खुलाशानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे. राम कपूरने हे गुपित आधी कधीच कोणाला सांगितले नव्हते. हे गुपित त्याच्या आरोग्याविषयी आणि संभाव्य मृत्यूविषयी होते, जे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.

६००+ ब्लड शुगर आणि मृत्यूचा धोका

ज्या वेळी सर्वाधिक रेटिंग असलेला टेलिव्हिजन स्टार म्हणून राम कपूरला प्रसिद्धी मिळत होती, त्या वेळी आरोग्याच्या दृष्टीने त्याची अत्यंत वाईट अवस्था होती. राम कपूरने सांगितले, “मी या इंडस्ट्रीमध्ये गेली २७ वर्षे काम केले आहे. मी अनेक चित्रपट केले आहेत, सर्व काही केले आहे. पण असा एक शो आहे ज्याने मला खरी ओळख दिली, तो म्हणजे ‘बडे अच्छे लगते हैं’. मी जगापासून एक गुपित लपवून ठेवले होते; माझ्या पत्नीलाही त्याबाबत माहिती नव्हती. जेव्हा मी या शोसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मी आयुष्यातील सर्वात वाईट नैराश्याचा (Depression) सामना करत होतो. माझे वजन खूप वाढले होते. माझ्याबद्दल इतके बोलले जायचे की काही काळ मी सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही स्टार होतो. माझे वजन दिवसेंदिव वाढतच गेले. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की माझी तब्येत इतकी बिघडली आहे की पुढच्या सहा महिन्यांत माझा मृत्यूही होऊ शकला असता. मी दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घेत होतो आणि मला डायबेटिक स्ट्रोक येण्याची शक्यता होती. माझी ब्लड शुगर ४००, ५०० आणि अगदी ६०० च्या वर जायची. तरीही मी दिवसातून १४ तास काम करायचो. मला त्या वेळी खूप प्रसिद्धी आणि पैसा मिळत होता, त्यामुळे मला ते सोडायचे नव्हते. मी हे सगळे मागे कसे सोडणार? या सगळ्यामुळे मी अत्यंत वाईट माणूस झालो होतो. मी शूटिंगला सहा तास उशिरा यायचो. मी सेटवर दारू प्यायचो. मी लोकांशी उद्धटपणे बोलायचो. मी एक राक्षस झालो होतो… अगदी राक्षस!”

अनियंत्रित मधुमेह खरोखरच जीवघेणा ठरू शकतो का?

राम कपूरच्या या कबुलींनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. पण आरोग्याच्या दृष्टीने पाहता ६०० पेक्षा जास्त ब्लड शुगर पातळी गाठणे ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. पण प्रश्न असा आहे की, ६०० पेक्षा जास्त ब्लड शुगर वाढल्यास खरंच एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो का? राम कपूरने यावर कशी मात केली? याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे?

६०० mg/dL च्या वर ब्लड शुगर गेल्याने खरंच मृत्यू होऊ शकतो का?

मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडी यांनी या मताशी सहमती दर्शवली की, “रक्तातील साखरेची पातळी ६०० mg/dL पेक्षा जास्त असणे ही सामान्य स्थिती नाही. या स्थितीकडे ‘फक्त ब्लड शुगर वाढली आहे’ असे म्हणून दुर्लक्ष करता येत नाही. ही पातळी मधुमेहावर योग्य नियंत्रण नसल्याचे लक्षण तर आहेच, पण त्यासोबतच ही अत्यंत गंभीर वैद्यकीय आणीबाणी (Medical Emergency) आहे, ज्यावर तातडीने रुग्णालयात उपचार होणे गरजेचे आहे.”

डॉ. घोडी यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा ब्लड शुगरची पातळी इतकी वाढते, तेव्हा अतिरिक्त साखरेमुळे लघवीवाटे शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते, ज्यामुळे शरीरात पाण्याची गंभीर कमतरता (Dehydration) निर्माण होते. यामुळे ‘हायपरोस्मोलर हायपरग्लायसेमिक स्टेट’ (Hyperosmolar Hyperglycaemic State – HHS) नावाची धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, जी टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. त्वरित उपचार न मिळाल्यास रुग्णाचा गोंधळ उडू शकतो, झटके येऊ शकतात किंवा रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. एवढेच नाही तर काही गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो. अशा पातळीकडे कधीही दुर्लक्ष करू नये आणि तातडीने रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे.”

अनियंत्रित मधुमेहामुळे स्ट्रोक किंवा इतर गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते का?

“होय. रक्तातील साखरेचे प्रमाण सतत जास्त राहिल्याने संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंना (Nerves) नुकसान पोहोचते. कालांतराने यामुळे पक्षाघात (Stroke), हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचे (Kidney) आजार, दृष्टी जाणे आणि मज्जातंतूंना इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते,” असे डॉ. घोडी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “जर रक्तातील साखर दीर्घकाळ अत्यंत जास्त राहिली, तर निर्जलीकरणामुळे (Dehydration) रक्त घट्ट होते, ज्यामुळे गंभीर हृदयविकाराची शक्यता वाढते. स्ट्रोक येईलच असे निश्चित नसले, तरी अनियंत्रित मधुमेह हा सर्वात महत्त्वाच्या आणि बदलता येण्याजोगा जोखमीच्या घटकांपैकी एक आहे. म्हणूनच लवकर निदान आणि सतत उपचार करणे आवश्यक आहे.”

मधुमेह क्वचितच एकदम धोकादायक बनतो; त्याऐवजी तो काही महिने किंवा वर्षांमध्ये हळूहळू वाढत जातो आणि या काळात शरीराला अनेक संकेत मिळतात. “ज्यांचे वजन जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे किंवा ज्यांची जीवनशैली बैठी आहे, त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. यामुळे कोणतीही गुंतागुंत होण्यापूर्वीच या आजाराचे निदान होऊ शकते,” असे डॉ. घोडी म्हणाले.

चांगली गोष्ट ही आहे की, त्वरित उपचार, सकस आहार, शारीरिक हालचाल आणि सातत्यपूर्ण देखरेखीद्वारे मधुमेहाचे प्रभावी व्यवस्थापन शक्य आहे. “जेव्हा लक्षणे गंभीर होतात, तेव्हाच लोकांच्या लक्षात येते की आजाराने आधीच असे नुकसान केले आहे जे वेळीच टाळता आले असते,” असे डॉ. घोडी यांनी स्पष्ट केले.