मेंदूवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावामुळे नागरिकांना हृद्रोगाचा धोका अधिक असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘द लँकेट’ या मासिकाने नुकतेच हे संशोधन स्पष्ट केले आहे. मानवी शरीरातील यंत्रणेचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला असून तणावाचा सर्वाधिक प्रभाव हृदयावर पडत असल्याचे संशोधकांनी मांडले आहे. त्यामुळे मेंदूवरील अतिरिक्त ताण आणि पर्यायाने हृद्रोगाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने संशोधकांनी केलेले हे संशोधन महत्त्वाचे ठरेल. धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे हृद्रोगाचा धोका मोठय़ा प्रमाणावर वाढतो, हे सर्वानाच ठाऊक आहे. मात्र, अतिरिक्त तणाव हा देखील हृद्रोगाला उपकारकच ठरणारा आहे. मेंदूवर पडणाऱ्या तणावामुळे हृद्रोगाचा धोका संभवतो यासंबंधी कोणत्याही प्रकारचे संशोधन यापूर्वी झालेले नाही. या संशोधनात २९३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्या मेंदूवर पडणारा तणाव आणि हृदयाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ३.७ वर्षांनंतर त्यांची पुन्हा तपासणी केली असता २२ रुग्णांना हृदयविकाराचा धोका वाढल्याचे आणि रक्तवाहिन्यांचे रोग बळावल्याचे स्पष्ट झाले. तसेच, यातील १३ रुग्णांना अतिरिक्त तणावामुळे हृद्रोग बळावल्याचे स्पष्ट झाले. बौद्धिक कार्य आणि तणाव यामुळेच रक्तवाहिन्यांवर सूज येणे आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या बंद होणे हे धोके संभवतात. (टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)