Cervical Cancer Symptoms & Prevention: भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) मोठ्या प्रमाणावर आढळतो. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) माहितीनुसार, भारतात दर ८ मिनिटांनी एका महिलेचा या आजारामुळे मृत्यू होतो. हा आजार अजूनही भारतीय महिलांमध्ये प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे. प्रत्येक आकड्याच्या मागे उशिरा झालेले निदान, न झालेली तपासणी किंवा न घेतलेली लस दडलेली असते.

“मी बेंगळुरूमधील एका मोठ्या कॅन्सर सेंटरमध्ये वरिष्ठ वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ म्हणून काम करतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा टाळता येण्यासारखा आजार आहे, तरीही १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात एखाद्या महिलेला हा आजार झाल्याचे सांगणे खूप कठीण असते. अनेकदा हा आजार अशा टप्प्यावर समजतो की तो आधीच टाळता आला असता,” असे डॉ. विश्वनाथ सत्यानारायणन (वरिष्ठ सल्लागार वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार, अपोलो हॉस्पिटल बेंगळुरू) द टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत सांगतात.

ते पुढे म्हणतात, “हा कर्करोग हळूहळू वाढतो आणि अनेक वर्षे लागतात. त्यामुळे आपल्याला तो लवकर ओळखण्याची किंवा पूर्णपणे टाळण्याची संधी मिळते.”

ही संथ गतीच या आजाराचा धोका आहे, पण त्याच वेळी तीच आपली मोठी संधीही आहे. प्रतिबंध योग्य पद्धतीने कसा करता येईल, याचे ५ मार्ग आज या लेखातून जाणून घेऊ या…

HPV लस : आजार होण्याआधीच मूळ कारण थांबवा

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) या संसर्गामुळे होतो.

“गर्भाशयाच्या मुखाचा बहुतांश कॅन्सर HPV मुळेच होतो,” असे डॉ. विश्वनाथ सत्यानारायणन सांगतात.

HPV हा व्हायरस खूप सामान्य आहे. बहुतेक वेळा शरीर स्वतःच हा संसर्ग बरा करते, पण काही धोकादायक प्रकार शरीरात अनेक वर्षे राहिले तर ते हळूहळू गर्भाशयाच्या पेशींमध्ये बदल घडवतात आणि कॅन्सरचा धोका वाढतो.

HPV लस या धोकादायक प्रकारांपासून संरक्षण देते. ही लस व्हायरसचा संपर्क होण्याआधी घेतली तर जास्त प्रभावी ठरते. साधारणपणे ९ ते १४ वयात ही लस देणे उत्तम असते. गरज असल्यास २६ वर्षांपर्यंत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यानंतरही देता येते.

ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे, तिथे गर्भाशयाच्या कर्करोगाचे आणि त्याआधीच्या टप्प्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. भारतातही आता National Immunization Programme अंतर्गत HPV लसीबाबत चर्चा सुरू झाली आहे. ही लस जीवनशैलीशी संबंधित नाही, ही कॅन्सरपासून बचावासाठी आहे.

तुम्हाला काही त्रास नसला तरी तपासणी करा

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर सुरुवातीला कोणतीही सूचना देत नाही; ना वेदना, ना इशारा.

डॉक्टर सांगतात, “या कॅन्सरची सुरुवात बहुतेक वेळा कोणत्याही लक्षणांशिवाय होते. सुरुवातीच्या बदलांमध्ये वेदना, रक्तस्राव किंवा त्रास जाणवत नाही.”

तपासणीमुळे पेशींमधील बदल कॅन्सर होण्याआधीच समजतात. यासाठी खालील तपासण्या केल्या जातात:

  • पॅप स्मिअर चाचणी
  • HPV DNA चाचणी
  • कमी सुविधा असलेल्या ठिकाणी डोळ्यांनी तपासणी

भारतामध्ये National Programme for Prevention and Control of Cancer, Diabetes, Cardiovascular Diseases and Stroke (NPCDCS) अंतर्गत लाखो महिलांची तपासणी झाली आहे. तरीही ग्रामीण भागात अजूनही सर्व महिलांपर्यंत ही सेवा पोहोचलेली नाही.

३० ते ६५ वयोगटातील महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करून घ्यावी. तपासणी ही आजार झाल्यावरची कृती नाही, तर आधीच बचाव करण्याची योजना आहे. “मला काहीच त्रास नाही” असे म्हणून तपासणी टाळली तर धोका हळूहळू वाढत जातो.

मौन न ठेवता सुरक्षित लैंगिक सवयी पाळा

HPV हा व्हायरस प्रामुख्याने लैंगिक संबंधांमधून पसरतो. “सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले, म्हणजे कंडोमचा नियमित वापर केला तर HPV पसरण्याचा धोका कमी होतो, पण तो पूर्णपणे नाहीसा होत नाही,” असे डॉ. विश्वनाथ सत्यानारायणन सांगतात.

अनेक लैंगिक साथीदार टाळणे आणि फार लवकर वयात लैंगिक संबंध न ठेवणे, यामुळेही धोकादायक HPV प्रकारांचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

भारतामध्ये लैंगिक आरोग्याबद्दल बोलणे अनेकदा लोकांना अवघड वाटते. पण, या विषयावर बोलणे टाळल्याने आजार कमी होत नाही, उलट प्रतिबंध उशिरा होतो. जेव्हा लाजेपेक्षा जागरूकता वाढते तेव्हा समाजाचे आरोग्य सुधारते.

धूम्रपान: दुर्लक्षित राहणारा गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका

धूम्रपान केवळ फुप्फुसांचेच नुकसान करत नाही, तर शरीरावरही वाईट परिणाम करते.

“धूम्रपानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे HPV संसर्ग दूर करणे शरीराला कठीण जाते. तंबाखूमधील घातक रसायने गर्भाशयातील स्त्रावामध्येही आढळली आहेत,” असे डॉ. विश्वनाथ सत्यानारायणन सांगतात.

जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तेव्हा HPV जास्त काळ शरीरात राहतो. दीर्घकाळ संसर्ग राहिल्यास कॅन्सरचा धोका वाढतो. ज्या महिला धूम्रपान सोडतात, त्यांच्या शरीराची ताकद हळूहळू पुन्हा वाढते. धोका लगेच कमी होत नाही, पण वेळेनुसार तो नक्कीच कमी होतो. गर्भाशयाच्या कॅन्सरपासून बचाव म्हणजे फक्त गर्भाशयाची काळजी घेणे नाही तर संपूर्ण शरीराचे आरोग्य जपणे आहे.

धोक्याची लक्षणे ओळखा आणि उपचारांना उशीर करू नका

प्रतिबंध केल्याने धोका कमी होतो. जागरूकतेमुळे जीव वाचतो.

खालील लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नयेत:

  • पाळीच्या मधल्या काळात रक्तस्राव होणे
  • लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे
  • रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणे
  • सतत दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे
  • पोटाच्या खालच्या भागात सतत वेदना राहणे

“भीती, लाज किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिला डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात. दुर्दैवाने याच कारणामुळे भारतात अनेक वेळा कॅन्सर उशिरा लक्षात येतो,” असे डॉ. विश्वनाथ सत्यानारायणन सांगतात.

स्वतःच्या शरीराचे संकेत ऐकणे म्हणजे अतिशयोक्ती नाही, तर जबाबदारी आहे. वेळेत आजार ओळखला गेला तर गर्भाशयाचा कॅन्सर प्रभावीपणे बरा होऊ शकतो आणि बरे होण्याची शक्यता खूप चांगली असते.

प्रतिबंध शक्य आहे: पण त्यासाठी साथ हवी

“प्रतिबंध प्रभावी ठरतो,” असे डॉक्टर ठामपणे सांगतात. “गर्भाशयाच्या कॅन्सरपासून बचाव ही फक्त महिलांची जबाबदारी नाही. त्यासाठी कुटुंब, डॉक्टर, शिक्षक आणि धोरण ठरवणारे लोक यांची साथ गरजेची आहे,” असे डॉ. विश्वनाथ सत्यानारायणन सांगतात.

आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. लस काम करते. तपासणी उपयोगी ठरते. लवकर उपचार केल्यास फायदा होतो, पण अनेकदा योग्य माहिती, सुविधा आणि प्राधान्य देणे यामध्येच कमतरता राहते. वेळेत माहिती न मिळाल्यामुळे कोणत्याही महिलेला कॅन्सर वॉर्डपर्यंत पोहोचावे लागणे हे दुर्दैवी आहे.