|| डॉ. गजानन वेल्हाळ पावसाळी आजारांची चर्चा करताना प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू, कावीळ, अतिसार, लेप्टोस्पायरोसिस, विषमज्वर या आजारांची चर्चा केली जाते. मात्र सध्या चिकुनगुनिया हा कीटकजन्य आजार डोके वर काढत आहे. अगदी मोठ्या प्रमाणात नाही, तरीही अलीकडे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्येही चिकुनगुनिया तापाचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांपासूनच चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव होतो. या आजाराविषयी. जगामध्ये १९५२ -५३ सालांपासून या आजाराची तुरळक प्रमाणात विविध देशांमध्ये (विशेषत: आफ्रिका खंडातील देश) नोंद आहे. आपल्या देशामध्ये १९६३ साली कोलकात्यामध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले होते आणि तेव्हापासून विविध राज्यांमध्ये अधूनमधून चिकुनगुनिया तापाच्या आजाराची साथ अल्प प्रमाणात दिसून आलेली आहे. २०१९ मध्ये देशात ६५,२१७ संशयित आणि ९,४७७ निदान पक्के झालेले रुग्ण होते. महाराष्ट्रामध्ये प्रथम १९७३ मध्ये आणि त्यानंतर कमी जास्त प्रमाणात विविध जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरपर्यंत १५०० पेक्षा जास्त रुग्ण मुख्यत्वे नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. लक्षणे तीन ते सात दिवसांच्या अधिशयन कालावधीनंतर अगदी अल्प काळात/ अचानक चढणारा ताप, प्रचंड डोकेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी आणि अंगावर दिसून येणारे, दोन ते तीन दिवस टिकणारे लालदार पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. मळमळ, उलट्या, अशक्तपणा, भूक न लागणे अशीही लक्षण्ो काही रुग्णांमध्ये दिसून येतात. वयोवृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया, लहान मुले, आणि प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये लक्षणांची तीव्रता जास्त असते. पाठदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी आणि डोकेदुखी या लक्षणांमुळे रुग्ण हात पाय दुमडून पोटाशी धरलेल्या अवस्थेमध्ये राहण्याचे पसंत करतो. साधारणपणे आईच्या गर्भाशयाच्या पोकळीमध्ये जशी लहान मुलाची अवस्था असते अगदी तशा अवस्थेमध्ये हे रुग्ण राहण्याचा प्रयत्न करतात. या अवस्थेला चिकुनगुनिया हा शब्द टांझानियाच्या (ज्या ठिकाणी या आजाराचे रुग्ण प्रथम दिसून आले) स्थानिक भाषेतील आहेत. प्रसारास कारणीभूत वाढते शहरीकरण, कालांतराने ºहास पावणारी समूह प्रतिकारशक्ती एडिस इजिप्ती डासाची मोठ्या प्रमाणात होणारी उत्पत्ती, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव या गोष्टी प्रामुख्याने चिकुनगुनिया तापाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. हा विकार झालेल्या रुग्णाला केलेल्या दंशामुळे विषाणू डासांमध्ये प्रवेश करतात. डासांच्या शरीरात त्यांची आणखी वाढ होते आणि साधारण ७ ते १० दिवसांनी हे बाधित डास दंशाच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला विषाणू संक्रमित करतात. अशा संक्रमण चक्रामुळेच रोग एका व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होतो. डेंग्यू आणि चिकुनगुनिया डेंग्यूचा ताप आणि चिकुनगुनिया ताप यांच्या लक्षणामध्ये बरेच साधम्र्य आहे. अर्थात डेंग्यूचा ताप काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूप धारण करतो आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे रुग्ण दगावण्याचा संभव असतो. तशी शक्यता चिकुनगुनियामध्ये खूप कमी असते आणि मृत्युदरही नगण्य असतो. परंतु चिकुनगुनिया आजारामध्ये दिसून येणारी सांधेदुखी (विशेषत: हाताचे मनगट, पायाचे खालचे सांधे आदी) काही रुग्णांमध्ये दीर्घकाळ म्हणजे तीन ते सहा महिन्यांपर्यंत त्रासदायक ठरते आणि त्यामुळे या आजाराविषयी लोकांच्या मनामध्ये भीती आहे. उपचार चिकुनगुन्या विषाणूंसाठी मारक ठरेल असे कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही. लक्षणांनुरूप औषधोपचार केला जातो. संपूर्ण विश्रांती, भरपूर पाणी आणि पौष्टिक आहार याच गोष्टी उपचारात्मक आहेत. सहसा रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत नाही. रोगमुक्त झाल्यानंतर मात्र आजार पश्चात होणाऱ्या त्रासासाठी तीन ते सहा महिन्यांपर्यंत निष्णात डॉक्टरांच्या निगराणी खाली राहणे आवश्यक आहे. डेंग्यू आणि चिकुनगुन्या प्रसारासाठी कारणीभूत ठरणारे डास एकाच प्रकारचे असल्याने प्रतिबंधक उपायही सारखेच आहेत. (लेखक सेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयात जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक आहेत.) आजार होऊ नये म्हणून. १ घरच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि डासाची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या. लक्षात ठेवा इडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती अगदी कमी पाण्यातही शक्य आहे. आणि म्हणून पाणी साठेल अशा वस्तू उदा. टायर, बाटलीची बुचे, वादळाच्या करवंट्या इत्यादी आजुबाजूला असणार नाहीत याची काळजी घ्या. २ घरामधील अडगळीच्या जागा साफ करा. जेणेकरून अशा ठिकाणी डासांचे वास्तव्य राहणार नाही. ३ डास चावणार नाहीत याकडे लक्ष द्या. इडिस इजिप्ती डास मुख्यत्वे उघड्या त्वचेवर चावतात जसे मोकळे हात व पाय. त्यामुळे जास्तीत जास्त शरीर झाकले जाईल याची काळजी घ्या. ४ धूरफवारणी घरच्या आतील भागामध्येही करून घ्या. ५ डास चावणार नाहीत यासाठी शक्य असेल तेथे मच्छरदाणीचा उपयोग करा. ६ आठवड्यातून एकदा घरातील पाणी साठविण्याची भांडी रिकामी करून साफ करा. गाव पातळीवर सर्वांनी मिळून ‘ड्राय डे’ म्हणजेच सर्व ठिकाणची / सर्व घरांमधील पाणी साठविण्याची भांडी रिकामी करून साफ करणे ही साप्ताहिक मोहीम राबवा.