Smell to clothes in Rainy Season: पावसाची सुरुवात झाली आहे. सततचा पाऊस आणि हवेत असलेल्या ओलाव्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे कपडे नीट न वाळणे आणि त्यातून दुर्गंधी येणे. अनेकदा कपड्यांना माशांसारखा तीव्र वास येऊ लागतो, त्यामुळे ते घालणेसुद्धा अवघड होते. धुतलेल्या कपड्यांतून असा वास येत असेल तर खूप त्रास होतो. खरं तर, सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते.
या विषयावर तज्ज्ञ रमेश सांगतात की, पावसाळ्यात कपड्यांना दुर्गंधी येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे ओलावा आणि हवेचा योग्य प्रवाह नसणे. कपडे बराच वेळ ओले राहिल्यास त्यामध्ये जीवाणू (बॅक्टेरिया) आणि बुरशी (फंगस) वाढू लागतात. त्यामुळेच कपड्यांतून विचित्र आणि तीव्र वास येऊ लागतो.
कपडे धुताना ही काळजी घ्या
रमेश यांच्या मते, सर्वप्रथम कपडे व्यवस्थित धुणे गरजेचे आहे. कपडे धुताना चांगल्या दर्जाच्या डिटर्जंटचा वापर करा. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे आफ्टर-वॉश आणि फॅब्रिक कंडिशनर उपलब्ध आहेत. शेवटच्या पाण्यात ते मिसळून कपडे धुतल्यास कपड्यांमध्ये बराच वेळ ताजेपणा आणि सुगंध टिकून राहतो.
कपड्यांमध्ये पाणी राहू देऊ नका
कपडे धुतल्यानंतर त्यामध्ये शक्य तितकं कमी पाणी राहील याची खात्री करा. म्हणजेच कपडे व्यवस्थित पिळून घ्या. शक्य असल्यास वॉशिंग मशीनच्या स्पिन मोडचा वापर करा किंवा हाताने चांगले पिळून घ्या. कपड्यांमध्ये जितकं कमी पाणी राहील, तितके ते लवकर वाळतील आणि दुर्गंधी येण्याची शक्यता कमी होईल.
खोलीचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा
पावसाळ्यात अनेकजण कपडे घरातच वाळत घालतात. अशा वेळी खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवू नयेत. हवेची योग्य ये-जा होणे खूप महत्त्वाचे आहे. खोली पूर्णपणे बंद असेल तर ओलावा वाढतो आणि कपडे वाळायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवा आणि पंखा सतत सुरू ठेवा, जेणेकरून हवेचा प्रवाह कायम राहील.
थोडी जरी उन्हं पडली तरी कपडे बाहेर वाळत घाला
दिवसात थोड्या वेळासाठी जरी सूर्यप्रकाश आला, तरी कपडे काही वेळ बाहेर उन्हात ठेवा. थोडंसं ऊनही कपड्यांतील ओलावा कमी करण्यास आणि दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. त्यानंतर तुम्ही कपडे पुन्हा घरात वाळत घालू शकता.
तज्ज्ञांचा आणखी एक सल्ला म्हणजे कपडे पूर्णपणे वाळल्यानंतर त्यांना इस्त्री जरूर करा. इस्त्रीच्या उष्णतेमुळे कपड्यांमध्ये राहिलेला ओलावा निघून जातो आणि दुर्गंधी येण्याची शक्यता खूप कमी होते.
थोडी काळजी घेणं गरजेचं
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात थोडी काळजी घेतल्यास कपडे ताजे आणि सुगंधी ठेवता येतात. योग्य पद्धतीने कपडे धुणे, पुरेशी हवा मिळू देणे, थोडा सूर्यप्रकाश मिळणे आणि कपड्यांना इस्त्री करणे या गोष्टींचा अवलंब केल्यास कपड्यांमधील दुर्गंधी सहज दूर करता येते आणि संपूर्ण पावसाळ्यात ताजेपणाचा आनंद घेता येतो.
