कराेनाकाळात वापरलेल्या दुचाकी खरेदी करण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यात फसवणूक होत असल्याचे प्रकारही वाढत आहेत. यामुळे या वापरलेल्या दुचाकी खरेदी करताना ग्राहकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, या विषयी ‘क्रेडआर’चे (उ१ीफि) मुख्य व्यवस्थापन अधिकारी शशिधर नंदिगम यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे. भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाडय़ा आहेत. असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत करून देईल अशा वापरलेल्या दुचाकींचा शोध घ्यायला हवा. अशी दुचाकी शोधण्यासाठी ग्राहक खूप धडपड करत असतात आणि बहुतेक वेळा अशा दुचाकी विकणारे आणि डीलर्स अशा दोन्हींकडूनही फसवणूकच त्यांच्या पदरी पडते. वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ खूप मोठी आहे, पण असे असूनही ग्राहकांना छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांबरोबर हे व्यवहार करताना खूपच निराशाजनक ग्राहक अनुभव येतो. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ आणि योग्य वाहनाची निवड कशी करावी याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. कंपनी प्रतिष्ठित हवी : इथे विचारात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या दर्जाची वापरलेली दुचाकी वाजवी किमतीत विकत घेऊ पाहणाऱ्यांनी नामांकित, विक्रीनंतरच्या सेवा, विमा आणि इतर मूल्यवर्धित सेवा, सारे एकाच ठिकाणी देऊ शकणाऱ्या कंपनी/ब्रॅण्डचीच दुचाकी खरेदी करायला हवी. बजेट आखा : खरेदीदारांनी वापरलेली दुचाकी खरेदी करताना अत्यंत स्वस्त दरात मिळणारी तसेच त्यासोबत अतिरिक्त कर, अवमूल्यन असे कोणतेही इतर घटक त्यात अंतर्भूत नसतील अशी दुचाकी विकत घेण्याचा विचार करावा. तसेच आपले बजेट ठरवताना दर्जा, दुचाकीचे वय, ब्रॅण्डचे मूल्य आणि आपल्याला हव्या असलेल्या दुचाकीची उपलब्धता अशा इतर घटकांचाही विचार केला पाहिजे. अभ्यास करा : ऑनलाइन तसेच विक्रेत्यांच्या माध्यमातून या विषयाची माहिती शोधली पाहिजे व या खरेदीसाठी वास्तविक, प्रत्यक्षात उतरवता येतील अशा अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण दुचाकीचे कोणतेही मॉडेल/ब्रॅण्ड त्यांच्या गरजांशी तंतोतंत जुळणारे असू शकत नाही. शिवाय इतर विक्रेत्यांबद्दल ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, रिवू, स्कोअर्सही तपासून घ्यायला हवेत. चांगले रेटिंग आणि ऑनलाइन मंचावर ग्राहकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळविणाऱ्या दुचाकी ब्रॅण्ड्स खरेदी करणे केव्हाही चांगले. घोटाळ्यांपासून सावध राहा : भारतातील वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ अजूनही खूपच असंघटित आहे, तेव्हा घोटाळेबाज, फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. इथे ग्राहकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. त्यांनी एखाद्या व्यक्तीकडून किंवा रस्त्यावरच्या छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्याऐवजी प्रमाणित, एखाद्या प्रतिष्ठित विक्रेता संस्थेचे नाव असणाऱ्या सेलर्सकडूनच अशा दुचाकी विकत घेण्याची खबरदारी घ्यायला हवी. होम टेस्ट राइड : खरेदीचा व्यवहार पक्का करण्याआधी ग्राहकाने गाडीची ‘ट्रायल रन’ घेण्याचा विचार करायला हवा. यामुळे आपण निवडलेली दुचाकी चालविण्यासाठी किती आरामशीर आहे, तिची रस्त्यावरची कामगिरी कशी आहे, ब्रेक्स आणि इतर घटकांचे यांत्रिक कार्य कसे चालते या सर्व बारकाईने पाहावयाच्या गोष्टींची कल्पना येते. ग्राहकांनी अशा सेवांचा आवर्जून वापर केला पाहिजे. वॉरंटीचा कालावधी/विक्रीनंतरचे लाभ : वापरलेल्या दुचाकीचा पर्याय निवडताना वॉरंटी संपण्याची तारीख आणि एक्स्चेंजची सुविधा किती काळापर्यंत लागू आहे हे तपासून घेणे चांगले. अशा मुद्दय़ांची स्पष्टपणे पडताळणी करून घेतली असेल तर खरेदी केलेल्या दुचाकीचा दर्जा असमाधानकारक वाटल्यास तुम्ही ती परत करू शकता किंवा बदल्यात नवीन दुचाकी घेऊ शकता. करोनानंतर वापरलेल्या वाहन खरेदीत वाढ २०२१ या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत वापरलेल्या (युज्ड) वाहनांच्या विक्रीत उल्लेखनीय वाढ झाल्याचे ‘ड्रूम’ या भारतातील ऑनलाइन ऑटोमोबाईल ट्रान्झॅक्शनल प्लॅटफॉर्मने नुकतेच जाहीर केले आहे. त्यांनी केलल्या सर्वेक्षणात साथीच्या रोगामुळे वैयक्तिक गतिशीलता हा वाहतुकीचा प्राधान्याचा मार्ग ठरला आहे. यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदविली आहे. चारचाकी वाहनांमध्ये मारुती सुझुकी वितारा ब्रेझा ही सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली असून बालेनो, होंडा सिटी आणि ह्य़ुंदाई वेर्नासारख्या प्रीमियम कारदेखील लोकप्रिय ठरल्या आहेत. दुचाकीच्या श्रेणीत बजाज पल्सर हे सर्वात लोकप्रिय वाहन असून त्यानंतर होंडा अॅक्टिव्हा थ्री जी आणि टीव्हीएस अॅपाचे आरटीआर हे वाहन आहे. लक्झरी व्हेइकल श्रेणीत कावासाकी निंजा आणि मर्सिडीज- बेंझ ई क्लास अनुक्रमे सर्वात लोकप्रिय लक्झरी बाईक आणि कार ठरल्या आहेत. या काळात कमी उत्पन्न किंवा नोकरी गमावल्यामुळे अनेक लोकांसाठी आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली. परिणामी वापरलेली वाहने स्वीकारण्यास ग्राहकांत चालना मिळाली असे ‘ड्रूम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप अग्रवाल यांनी म्हटले आहे. कागदपत्रांची पडताळणी : महत्त्वाचे म्हणजे वापरलेल्या दुचाकीविकत घेण्यापूर्वी विमा, आरसी बुक, चॅसिस नंबर, मॅन्युफॅक्चरिंगची तारीख आणि प्रदूषण प्रमाणपत्र या सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. गाडीवर आधी घेतलेले कर्ज असेल तर बँक हायपॉथिकेशन सर्टिफिकेट असायलाच हवे. आरटीओमध्ये पैसे भरून गाडीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्यास तुम्ही निवडलेल्या दुचाकीवर नियमभंगांचे कोणते गुन्हे वगैरे दाखल झाले आहेत किंवा नाहीत हेही कळू शकेल. सध्याच्या काळात, डुप्लिकेट कागदपत्रे मिळविणे अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे अशी कागदपत्रे देऊन सेलर्सकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अत्यंत बारकाईने पडताळणी करायला हवी.