जगात आत्महत्येची राजधानी बनण्याकडे भारताची वाटचाल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्महत्येची ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणे ही नैराश्याशी निगडित आहेत. गेल्या काही दशकात आत्महत्येच्या संख्येत तीन पट वाढ झाली असून, १५ ते २४ वयोगटात हे प्रमाण अधिक दिसून आल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. आत्महत्या करणाऱ्या ४० टक्के पुरुष आणि ५६ टक्के स्त्रियांचे वय १५ ते २४ च्या घरात आढळून आल्याची माहिती दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले मानसोपचार तज्ञ आत्मेश कुमार यांनी दिली. नैराश्य हे आत्महत्येचे प्रमुख कारण असून, ही एक गंभीर मानसिक समस्या आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्यामुळे केवळ मानसिक स्वास्थ्य प्रभावित न होता मांसपेशींमध्ये ताण निर्माण होणे, थकवा जाणवणे आणि डोकेदुखीसारख्या विविध शारिरीक समस्या उद्भवत असल्याचे कुमार म्हणाले. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये जवळजवळ ९० टक्के व्यक्ती या मानसिक विकाराच्या शिकार असतात. ज्यामध्ये नैराश्य हे प्रमुख कारण असते. तणावाच्या स्तरात झालेली वाढ, कुटुंबांमध्ये कमी होणारे सौदार्ह्याचे वातावरण आणि वेळेवर उपचार न केल्याने आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याचेदेखील ते म्हणाले. ढासळती सामाजिक रचना आणि जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे तरुणांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढत चालल्याचे मत आरोग्य विषयक ऑनलाईन पोर्टलच्या एका जेष्ठ मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केले. नैराश्याचे अनेक प्रकार असून, प्रामुख्याने इंडोजीनस आणि रिएक्टिव प्रकारात मोडते. इंडोजिनस नैराश्य जैविक असते, तर रिएक्टिव नैराश्य जिवनातील घटनांशी संबंधित असते.