|| वैद्य अश्विन शिवाजी सावंत पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या दिवाळीच्या फराळाची परंपरा सुरू आहे. आता दिवाळी सरली असली तरी फराळाची रुचकरता अजूनही कायम आहे. काळानुसार फराळातील पदार्थांमध्ये अनेक बदल घडत गेले. परंतु सध्याची जीवनशैली लक्षात घेता आरोग्याच्या दृष्टीने या फराळामध्ये आणखी काही बदल होणे गरजेचे आहे. दिवाळीच्या अर्थात आश्विन आमावास्येच्या आधी ज्येष्ठ महिन्यापासून ते भाद्रपद महिन्यापर्यंत शेतकरी आपल्या शेतात राबतात. भाद्रपदानंतर आश्विन महिन्यात शेतकऱ्यांचे घर-कोठार धान्याने भरून जाते. पूर्वीच्या काळात धान्य हेच समृद्धी आणि संपन्नतेचे द्योतक असल्याने घरादारात धान्याची आवक हा सोहळा साजरा करण्याचा आणि शेतीसाठी केलेल्या अमाप मेहनतीचा आनंद घेण्याचा काळ होता. ज्यामधून आश्विन महिन्याच्या आमावास्येला रात्री दाटणाऱ्या गाढ काळोखाचा विचार करूनच दिव्यांच्या सणाची योजना करण्यात आली आणि मुबलक उपलब्ध होणाऱ्या या धान्यांपासून वैविध्यपूर्ण रुचकर फराळ तयार करण्याची परंपरा सुरू झाली. पुढे या पदार्थांमध्ये प्रदेशानुसार व काळानुरूप अधिकाधिक पदार्थांची भर पडत गेली आणि वैविध्यपूर्ण व रुचकर दिवाळी फराळाची परंपरा निर्माण होऊन प्रदीर्घ काळ अव्याहत सुरू राहिली. पूर्वी फराळाचे बहुतांश पदार्थ हे गहू-तांदूळ अशा तृणधान्यांपासून किंवा चणे, मूग वगैरे कडधान्यांचा वापर करून तयार केले जात होते आणि गोडासाठी उपयोग केला जात होता गुळाचा. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये धान्याची जागा मैद्याने तर गुळाच्या जागी साखरेचा वापर वाढला आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरोत्तर काळात तर फराळामध्ये माव्याच्या मिठाई आणि चॉकलेट यांचाही समावेश व्हायला सुरुवात झाली आहे. फराळाचे नैसर्गिक स्वरूप आणि गुण बदलल्याने ते स्वास्थ्यास पोषक होण्याऐवजी बाधकच अधिक होत असल्याचे आढळते. शरद ऋतूपासून शिशिर ऋतूपर्यंत दक्षिणायनामध्ये म्हणजे हिवाळा संपेपर्यंत अर्थात शरीराचे बल वाढविण्यासाठी पौष्टिक आहार मिळण्याच्या उद्देशानेही दिवाळी फराळाची सुरुवात झाली. परंतु मागील एक दशकापासून निसर्गाचे ऋतूचक्र बदलल्यामुळे दिवाळीमध्ये थंडीचा मागमूसही नसतो, उलट वातावरणात उष्मा वाढल्याचे आढळत आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये शरद ऋतूची लक्षणे अधिक असतात. शरद ऋतू हा पित्तप्रकोपाचा, शरीरात उष्णता वाढवणारा, अग्नी (भूक, पचनशक्ती व चयापचय) सुस्थितीमध्ये नसलेला असा काळ असल्याने त्या दिवसांत शरीराला उष्णता (ऊर्जा) पुरवणारा व पचायला जड असा दिवाळीचा आहाराचे सेवन केल्याने त्रासच अधिक होत असल्याचे आढळले आहे. परिणामी दिवाळीनंतर काहीच दिवसांत अपचन, अम्लपित्त, पोटदुखी, आंव पडणे, मलावरोध, मूळव्याध-फिशर्ससारखे गुदविकार, अंगावर पित्त उठणे, सर्दी-खोकला-दमा यांसारखे श्वसनविकार, रक्तातली साखर वाढणे वगैरे विकार बळावल्याचे दिसते. यामागे अयोग्य आहार हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीला पूरक असा दिवाळी फराळातही बदल होणे ही काळाची गरज बनली आहे. फराळ तयार करताना साखरेचा वापर पूर्णपणे थांबवून त्या ऐवजी नैसर्गिक गुळाचा उपयोग आणि तोही तोसुद्धा मर्यादेत करणे आवश्यक आहे. तसेच मैद्याचा वापर न करता त्याऐवजी भाजलेल्या अखंड धान्यांचा व डाळींचा उपयोग करणे, मिठाई बनवताना मावा न वापरता सुका मेवा, तेलबिया, फळांच्या बिया यांचा उपयोग करणे, तळण्याऐवजी बेकिंगचा उपयोग करणे, तळण्यासाठी उत्तम धुमांक असलेल्या गायीच्या तुपाचा किंवा खोबरेल तेलाचा उपयोग करणे वगैरे स्वास्थ्यास उपकारक बदल करणे आरोग्यदृष्टीने महत्त्वाचे आहे. यांसह फराळ बनविण्यासाठी सुधान्यांचा उपयोग करणे अत्यावश्यक आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी वगैरे प्रचलित धान्यांऐवजी ऋषिमुनींचे व्रतवैकल्याचे धान्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या, आदिवासी नित्य सेवन करत असलेल्या भगर, देवभात, वरी, राळ, समै, कसई, सामूल या तृणधान्यांचा उपयोग आपण केला पाहिजे. आयुर्वेदाने ही धान्ये कुधान्ये म्हणून सांगितली आहेत, कारण ती शरीरावरची चरबी घटवतात आणि देह कृश करतात. हा त्यांचा दोष आजच्या जीवनशैलीसाठी उपकारक होणार आहे. रक्तामधील साखर न वाढवण्याचा, शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे व खनिजे प्रचलित धान्यांपेक्षा अधिक मात्रेत पुरवण्याचा त्यांचा गुणसुद्धा आपल्या शरीरांना हितकारक असेल. म्हणूनच २१व्या शतकातल्या स्थूल-मधुमेही समाजासाठी ही कुधान्ये नसून सुधान्ये आहेत.