नवी दिल्ली : तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असलेले खाद्यपदार्थ पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त समजण्यात येतात. तसेच ते मधुमेह, बद्धकोष्ठता आदी व्याधींपासून मुक्ती देण्यासाठीही मदत करतात; पण नव्या संशोधनानुसार अशा पदार्थामुळे मानसिक आरोग्यही सुधारते, असे स्पष्ट झाले आहे. आहारतज्ज्ञही याच कारणामुळे अशा खाद्यपदार्थाचे आहारातील प्रमाण वाढवण्याचा सल्ला देतात. भूक आणि रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी तंतुमय पदार्थ फायदेशीर आहे. चांगल्या आरोग्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीला दररोज २५ ते ३० ग्राम फायबरची आवश्यकता असते; परंतु बहुसंख्य लोक अवघ्या १५ ग्राम तंतुमय पदार्थाचा आहारात समावेश करतात, असे दिसून आले आहे. ‘हावर्ड हेल्थ’च्या संशोधनानुसार तंतुमय पदार्थाचा अधिक आहारात समावेश केला तर स्मृतिभ्रंश व्याधीचा धोका कमी होऊ शकतो. या संशोधनात ४० ते ६४ या वयोगटांतील ३ हजार ७०० जणांचा समावेश करण्यात आला होता. तब्बल १६ वर्षे या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले होते. त्या वेळी वरील निष्कर्ष काढण्यात आले.