Kidney Stone Causing Foods List : हल्ली अनेकांना किडनी स्टोरची समस्या जाणवताना दिसतेय, यामागे चुकीची जीवनशैली, पाणी कमी पिणे, चुकीचे पदार्थ खाणे यासांरख्या सवयी कारणीभूत आहेत. बरेच लोक अनेकदा असे काही पदार्थ खातात, ज्यामुळे शरीरातील काही खनिजांची पातळी वाढून स्टोन तयार होण्याचा धोका वाढू शकतो. सुरुवातीला लक्षणे सौम्य असू शकतात, परंतु कालांतराने या समस्येमुळे तीव्र वेदना आणि इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
किडनी स्टोनमुळे पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे आणि कधीकधी मळमळ देखील होऊ शकते. बरेच लोक ही लक्षणे सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. अशावेळी आहार आणि जीवनशैलीकडे वेळेवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. योग्य माहिती आणि संतुलित आहाराचे पालन केल्यास किडनी स्टोनचा धोका मोठ्याप्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणूनच, कोणत्या पदार्थांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो आणि ते टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
कोणत्या पदार्थांमुळे किडनी स्टोन होतो?
लेडी हार्डिंग हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे संचालक आणि विभागप्रमुख डॉ. एल. एच. घोटेकर स्पष्ट करतात की, अतिरिक्त मीठ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. याशिवाय, काही पदार्थांमध्ये ऑक्झॅलेटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात जमा होऊन स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकते.
अति प्रमाणात जंक फूड खाणे आणि कमी पाणी पिणे यामुळे देखील ही समस्या वाढू शकते. काही लोक शीतपेये किंवा पॅकेज केलेल्या पेयांचे अतिसेवन करतात, ज्यामुळे मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
मूत्रपिंडे निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. याव्यतिरिक्त, ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि हलके जेवण फायदेशीर ठरू शकते. नारळाचे पाणी, लिंबू सरबत आणि तंतुमय पदार्थ (फायबर) असलेले अन्नपदार्थ देखील शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.
अतिरिक्त मीठ खाणे आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा. संतुलित आहार घेतल्याने मूत्रपिंडाचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.
डॉक्टरांना कधी भेटावे?
जर तुम्हाला सतत, तीव्र पोटदुखी किंवा पाठदुखी, लघवी करताना जळजळ होणे किंवा लघवीतून रक्त येणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याव्यतिरिक्त, वारंवार उलट्या होणे, ताप येणे किंवा लघवी करण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास देखील तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार केल्यास आजार गंभीर होण्यापासून रोखता येतो.
(टीप – कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
