परदेशात फिरायला जाणे ही पूर्वी स्वप्नवत असणारी गोष्ट आता सत्यात उतरताना दिसत आहे. आता परदेशात जायचे म्हटल्यावर आपल्याकडे पासपोर्ट आणि व्हीसा असायलाच हवा. अनेकदा पासपोर्ट काढलेला असतो पण व्हीसा काढण्यासाठी येणारा खर्च आणि त्याचा ताण आपल्याला घ्यावाच लागतो. मात्र असे काही देश आहेत ज्या देशांमध्ये भारतीयांना व्हीसाशिवाय जाता येते. जगातील पॉवरफुल पासपोर्ट असणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा ६६ वा क्रमांक लागतो. त्यामुळे परदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर यावर्षीसाठी ही अतिशय चांगली संधी आहे. तर २०१८ या वर्षात भारतीय जवळपास २५ देशांमध्ये व्हीसाशिवाय जाऊ शकतात. पाहूयात यातील ७ निसर्गरम्य देश ज्याठिकाणी भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येईल. इंडोनेशिया भारतीय नागरिक इंडोनेशियात व्हिसाशिवाय ३० दिवस राहू शकतात. बाली हे येथील जगभरात प्रसिद्ध असणारे पर्यटनस्थळ आहे. नुकतेच एशियन गेम्स पार पडलेल्या या देशातील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. याठिकाणी अनेक आयलंड असून जकार्ता ही देशाची राजधानीही पाहण्यासारखी आहे. भूतान जगातील सुखी देश अशी या देशाची ओळख होते. बुद्धिस्ट लोकांच्या विविध स्थळांसाठी भूतानची राजधानी तिम्फू प्रसिद्ध आहे. याशिवायही डोंगरदऱ्यांनी वेढलेला हा देश पाहण्यासारखा आणि डोळ्यांना खऱ्या अर्थाने सुखावणारा आहे. मालदीव बेटांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात भारतीय ९० दिवसांसाठी राहू शकतात. येथील समुद्रकिनारे अक्षरश: नयनरम्य आणि सुखावणारे आहेत. हनिमूनला जाण्यासाठीही भारतीय या देशाला विशेष पसंती देतात. मॉरिशस मॉरिशसमध्येही भारतीय पर्यटक ९० दिवसांसाठी जाऊ शकतात. येथील समुद्रकिनारे अतिशय सुंदर असून बाजूला असणाऱ्या डोंगररांगांमुळे त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. यासोबतच याठिकाणी असणारे धबधबे, जंगले यांमुळे या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. नेपाळ १९५० मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात झालेल्या शांतता करारामुळे भारतीयांना नेपाळमध्ये सहज प्रवेश दिला जातो. ज्याप्रमाणे नेपाळी लोक भारतात मोकळेपणाने राहू शकतात. त्याचप्रमाणे भारतीयांनाही नेपाळमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे. इतर पर्यटन स्थळांबरोबरच माऊंट एव्हरेस्टमुळेही या देशाला पर्यटनाच्यादृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.