हिंदू धर्मात श्रीगणेशाला आराध्य दैवत मानलं जातं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते. गणपती म्हणजे बुद्धी-समृद्धी-सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती. याच श्रीगणेशचा उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा गणेश चतुर्थीचा सण शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जाईल. या उत्सवासाठीच्या तयारीला आतापासूनच जोमाने सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. अनेक जण वर्षभर फक्त याच सणाची इतक्या मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. खरंतर, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाही अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा करायचा आहे. मात्र, भाविकांच्या मनातला उत्साह आणि आतुरता तितकीच आहे. गणेशोत्सवाच्या या १० दिवसांमध्ये असणाऱ्या अत्यंत प्रसन्न आणि मंगलदायी वातावरणामुळे हा उत्सव आणखी खास ठरतो. निश्चितच तुमच्यापैकी अनेकांना गणेशोत्सवाची उत्सुकता लागलीच असेल. याचनिमित्ताने आज आपण गणेश चतुर्थीचं महत्त्व आणि कथा जाणून घेणार आहोत. गणेश चतुर्थीची कथा गणेश चतुर्थीला विनायक चतुर्दशी म्हणूनही ओळखलं जातं. गणेशोत्सव हा एक अत्यंत महत्त्वाचा हिंदू सण मानला जातो. महादेव शंकर आणि माता पार्वतीचा पुत्र गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. यामागची कथा निश्चित तुम्हाला माहिती असेल. पौराणिक कथेनुसार या दिवशी, माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती बनवते आणि त्यात प्राण ओतते. पार्वती या लहान मुलाला आपलं स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते. कोणालाही आत न पाठवण्याच्या सूचना देते. त्याप्रमाणे, तो लहान मुलगा कक्षाबाहेर पहारा देत असतो. अशावेळी तिथे महादेव शंकर येतात. त्यावेळी हे दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. त्यामुळे हा लहान मुलगा शंकराला पार्वतीच्या कक्षात जाण्यापासून अडवतो. शंकर ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगा देखील काही केल्या त्याला माता पार्वतीच्या कक्षात जाऊ देत नाही. पुढे शंकराला आपला राग अनावर होतो. या दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशुळाने गणेशाचं शीर कापतो. तोपर्यंत पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी आणि संतप्त होते. शंकराकडे आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट धरते. त्यावेळी, शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचं डोकं आणण्यास सांगतो. त्याच्या देवतांना सापडलेलं पहिलं डोकं हत्तीचं असतं. अखेर भगवान शंकर ते हत्तीचं डोकं त्या लहान मुलाच्या धडाला जोडतो आणि श्रीगणेशाचा जन्म होतो. अशी ही कथा आहे. गणेश चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि वाढ होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात