नवी दिल्ली : कधी तरी गोड खाण्याचा मोह होणे नैसर्गिक असते. मात्र दररोज साखरयुक्त गोड पदार्थाचे सेवन आरोग्यासाठी नक्कीच चांगले नाही. साखरेच्या या मोहावर मात करण्यासाठी आपल्या आहाराचे समजून घेऊन, त्याचे विश्लेषण करणे गरजेचे असते. आपण काय खातो, याविषयी सजग राहणेही अत्यंत गरजेचे आहे. भोजनानंतर तुम्हाला गोड खाण्याचा मोह होत असेल. तर आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात थोडा बदल केल्यास त्यावर मात करता येईल. जर तुमच्या आहारात पिष्टमय पदार्थाचा समावेश जास्त असेल व त्या तुलनेत प्रथिने किंवा चरबीयुक्त घटक कमी असतील, तर तुमच्या आहारात अधिक शेंगा, पनीर, टोफू (सोया दुधापासून केलेला पदार्थ) यांचा समावेश करावा. लोह, िझक, क्रोमियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम हे क्षारयुक्त घटक पुरेशा प्रमाणात आपल्या आहारातून मिळत नसतील, तर आपल्याला साखर खाण्याचा मोह होऊ शकतो. जर मॅग्नेशियमची कमतरता जाणवत असेल, तर त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. चिया बियाणे, तीळ, पिस्ता आणि फळांचे आहारातील प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी केळी खाणे उपयुक्त ठरते. ड जीवनसत्त्व व ब-१२ जीवनसत्त्वाच्या अभावाने शरीर पोषक घटक शोषून घेऊ शकत नाही. ड जीवनसत्त्वाच्या शरीरातील स्तराची तपासणी करावी. जर ते कमी असल्यास सारखी भूक लागत राहते. त्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. सारखा तणाव असणे. त्याचे नीट व्यवस्थापन न केल्याने भुकेवर विपरीत परिणाम होऊन गोड पदार्थ खाण्याचा मोह होऊ शकतो. त्यामुळे स्थूलत्व वाढण्याचा धोका असतो. पुरेशी झोप न घेतल्याने संप्रेरकांच्या असंतुलनाने भूक अकारण लागते. त्यात गोड खाण्याचाही मोह होतो. साखरेचे आहारातील प्रमाण कमी करण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पचनक्षमता वाढल्याने शरीरात निर्माण झालेली विषद्रव्ये प्रभावीपणे बाहेर टाकली जातात. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन आपली आहार व जीवनशैली बदलल्यास गोड म्हणजे साखर खाण्याच्या मोहावर मात करता येते, असा आहारतज्ज्ञांचा सल्ला आहे.