नवी दिल्ली : धकाधकीचे जीवन, कामात जाणारा दीर्घ काळ व तंत्रज्ञानावर विसंबून असलेली जीवनशैली, ‘मोबाइल’, ‘लॅपटॉप’, ‘टॅब’चे स्क्रीन पाहात आपण आपल्या झोपेच्या वेळेचा एक मोठा भाग वाया घालवतो. परिणामी झोप कमी होते त्यामुळे अनारोग्याला निमंत्रण मिळते. हीच जीवनशैली दीर्घकाळ राहिल्यास, शरीरावरील ताण आणखी वाढतो व संप्रेरकांचे (हार्मोन) असंतुलन, भावावस्था बदलणे, थकवा, हृदयविकारांसारख्या अनेक अनारोग्यकारक समस्या निर्माण होण्याचा संभव असतो. आहारतज्ज्ञांच्या मते प्रत्येकाच्या शरीरात एक जैविक घडय़ाळ (बॉडी क्लॉक) असते. जे आपली जैविक लय आपल्या भवतालाशी जुळवून घेण्यास सक्षम असते. याला वैद्यकीय परिभाषेत सर्केंडियन लय’ म्हणतात. बहुसंख्य लोक उशिरापर्यंत झोपणे, संगणक किंवा स्मार्टफोनवर काम करणे, क्वचितच घराबाहेर फिरायला बाहेर पडणे किंवा व्यायाम करणे, प्रक्रियायुक्त अन्नसेवन, रात्री उशिरापर्यंत आहार आणि मद्यपान करणे. रात्री उशिरापर्यंत जागे राहाण्यासाठी चहा-कॉफीसारखी ‘कॅफिन’युक्त पेयप्राशनाने आपल्यातील जैविक घडय़ाळाची लय बिघडते. अशा खराब सवयींमुळे बदललेली जैविक लय नियमित करणे अत्यंत गरजेचे असते. तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही बिघडलेली जैविक लय बदलण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी सातत्य व चिकाटीची गरज आहे. तेवढे केल्यास जैविक लय पूर्ववत होणे सहजशक्य आहे. आपली जैविक लय आपल्या शरीराला केव्हा उठायचे, केव्हा अंथरुणाबाहेर पडायचे, केव्हा झोपायचे, केव्हा खायचे याविषयी सातत्याने सांगत असते. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे शरीरांतर्गत घडय़ाळ योग्य लयीत ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी दररोज नियमित सूर्यस्नान (कोवळे ऊन अंगावर घेणे), पुरेशी झोप घेणे, पौष्टिक आहार ठरावीक अंतराने घेणे, ध्यानधारणा, श्वासोच्छवासाचे प्राणायामसारखे व्यायाम, निसर्गात सजगपणे फिरणे व नियमित व्यायाम ही लय पुन्हा मिळवता येते, असे तज्ज्ञ सांगतात.