पीटीआय, जयपूर : राजस्थानमधील ९० टक्के नागरिकांना आरोग्य विम्याचे कवच असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. याबाबतचे जे वृत्त आले आहे ते समाधानकारक असल्याचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी नमूद केले. देशात सर्वसाधारणपणे दहापैकी ४ नागरिकांचा आरोग्य विमा आहे. मात्र राजस्थानमध्ये प्रत्येक दहा नागरिकांमागे ९ जणांचा आरोग्य विमा आहे. चिरंजीवी योजनेचे हे यश असल्याचे ट्वीट गेहलोत यांनी केले आहे. राज्य सरकारसाठी ही दिलासा देणारी बाब आहे, असे गेहलोत यांनी नमूद केले आहे. दहा लाख रुपयांच्या आरोग्य विम्याची सुविधा योजना राज्यात चिरंजीवी योजनेंतर्गत सर्वाना आहे. चिरंजीवी योजना राजस्थान सरकारची आरोग्यसेवा यामुळे नागरिकांना आता आरोग्य सुविधांवरील खर्चाबाबत चिंता करण्याची गरज नाही, असे गेहलोत यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. चिरंजीवी योजनेच्या धर्तीवर आयुषमान भारत योजनेची व्याप्ती केंद्र सरकारने वाढवावी, अशी मागणी गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. आयुषमान भारत योजना देशातील प्रत्येक नागरिकाला लागू करावी, अशी मागणीही गेहलोत यांनी केली आहे.