उन्हाळ्यात घामोळे येणं या समस्येचा अनेकांना सामना करावा लागतो. सामान्यतः त्वचेमध्ये घाम अडकल्याने हा त्रास होतो. दमट हवामान असलेल्या ठिकाणी राहणाऱ्यांना विशेषतः याचा त्रास होतो. काही दिवसांनी हे घामोळे आपोआप जातात, मात्र त्यांचा त्रास जास्त प्रमाणावर होतो. त्यांच्यामुळे त्वचेवर खाज सुटते. खाजवल्याने हा त्रास आणखीनच वाढतो. अशावेळी या त्रासातून सुटका कशी मिळवायची यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय जाणून घ्या… उन्हाळ्याच्या दिवसात सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे कच्चा आंबा अर्थातच कैरी. कैरीच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेचं उष्णतेपासून संरक्षण करू शकता. त्यासाठी कैरी प्रथम गॅसवर भाजून घ्यावी, थंड झाल्यावर त्याचा लगदा काढून फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर हा लगदा अंगावर लावा. काकडीसुद्धा घामोळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस घालून या पाण्यात काकडीचे पातळ काप टाका. हे काप आता घामोळे आलेल्या भागांवर हळूहळू घासून लावा. खोबरेल तेलाचेही अनेक फायदे आहेत. घामोळ्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठीही हे उपयुक्त आहे. यासाठी खोबरेल तेलात कापूर मिसळा आणि या तेलाने शरीराची मालिश करा. याच्या वापराने उष्णता आणि घामोळ्यांपासून नक्कीच आराम मिळतो. याशिवाय एक लिटर पाण्यात कडुलिंबाची पानं उकळून हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळून या पाण्याने रोज अंघोळ केल्यास घामोळे लवकर निघून जातील. तुळशीचं लाकूड बारीक करून त्याची पावडर बनवा आणि ही पेस्ट घामोळे आलेल्या जागेवर लावा. त्यानेही बराच आराम मिळेल. तसंच दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आणि एक वाटी पाण्यात मिसळा आणि शरीराच्या प्रभावित भागावर लावा. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यासोबतच कोरफडीचाही वापर घामोळ्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी करता येईल. एलोवेरा जेल घ्या आणि घामोळे आलेल्या भागावर लावा. रात्री झोपताना लावल्यास सकाळी घामोळे कमी होतील.