नवी दिल्ली : ज्या हवेत आपण दररोज श्वास घेतो आणि जे अन्न आपण खातो त्यात बरीच विषद्रव्ये (टॉक्सिन) मिसळलेली असतात. या विषद्रव्यांना संपूर्ण प्रतिबंध करणे आपल्या नियंत्रणाबाहेर असते. आपल्या दिनचर्येतील बदल, आहारातून काही बाबी वगळणे व काही आरोग्यास पूरक नवीन बाबींचा समावेश करणे यातून या विषद्रव्यांचे प्रमाण आपण कमी करू शकतो. आहारतज्ज्ञांच्या मते, स्थानिक-हंगामी फळे आणि भाजीपाल्याचा आहारात समावेश करावा. ठरावीक भागातील अनुकूलतेनुसार हे अन्नघटक उगवल्याने त्यात कसदारपणा व पोषणमूल्ये असतात. फक्त कोणतेही रासायनिक घटक अथवा कीटकनाशके त्यात नसावीत. शाम्पू ते अत्तरापर्यंत अनेक प्रकारे आपण रसायनमिश्रित उत्पादने केस आणि शरीरावर लावत असतो. त्याऐवजी नैसर्गिक घटक असलेली उत्पादने वापरल्यास रासायनिक घातक घटकांशी आपला संपर्क येणार नाही. केस धुताना शाम्पूऐवजी रिठा-शिकेकाई लावावी. अंग धुण्यासाठी बेसन पीठ आणि उटणे लावता येते. उत्पादनांतील रासायनिक घटक ओळखून शक्यतो त्यांचा वापर कमी करत आणून, या विषद्रव्यांच्या दुष्परिणामांपासून दूर राहणे शक्य आहे. मोबाइल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक ‘गॅजेट’वर जास्त काळ व्यतीत केल्यास तणावात वाढ होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर दुष्परिणाम होतो. या ‘गॅजेट’मुळे होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे शरीरातील उतींवर दुष्परिणाम होतो. प्रसंगी कर्करोग होण्याची जोखीमही वाढते, असे अलीकडील अभ्यासांचे निष्कर्ष सांगतात. नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीरातून विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. दररोज विविध प्रकारे विषद्रव्यांचा मारा आपल्यावर होत असतो. आपल्याला त्याचा अंदाजही येणार नाही, एवढे हे प्रमाण जास्त असते. नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले होते. त्याद्वारे संरक्षक पांढऱ्या पेशींच्या स्रावाचे चांगले अभिसरण होते. त्यामुळे जिवाणूंचा खात्मा तर होतोच, शिवाय विषद्रव्येही बाहेर टाकण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, सुयोग्य पुरेशा झोपेमुळे मेंदूच्या पेशीय संरचनेवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे विषारी घटकांचे निर्मूलन होते.