नवी दिल्ली : हाडांच्या आरोग्यासाठी ‘कॅल्शियम’ महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या हाडांतील अल्प प्रमाणातील कॅल्शियम शरीर नियमित बाहेर टाकत असते व त्या जागी नवे कॅल्शियम घेते. परंतु शरीर नवे कॅल्शियम शोषून घेण्याच्या प्रमाणात ते जास्त प्रमाणात उत्सर्जित करू लागले तर हाडे कमजोर व ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे, अनेक जण हाडे मजबूत करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्याच्या प्रयत्नात कॅल्शियम पूरक आहार घेतात. ही हाडे कशामुळे कमजोर आणि ठिसूळ होतात? त्यांना कशामुळे पूरक कॅल्शियमची गरज भासते? याची कारणे तज्ज्ञ सांगतात, ती अशी : अति प्रक्रियायुक्त अन्न, दुग्धजन्य उत्पादनांचे अतिसेवन किंवा अति मांसाहारामुळे आपल्या शरीरातील आम्लतेचे प्रमाण वाढते. त्याला संतुलित करण्यासाठी आणि रक्तातील पीएच स्तर ७.४ एवढा ठेवण्यासाठी आपले शरीर हाडांमधील कॅल्शियमसारखी खनिजे वापरतात. त्यामुळे हाडे कमजोर होतात. जर आपल्या हालचाली कमी असतील तर आपली हाडे सक्रिय राहात नाहीत. त्यामुळे ती मजबूत होत नाहीत. अतिताण आणि विषद्रव्यांच्या संपर्कात येण्यामुळे हाडांना इजा होते व त्यातील खनिजे बाहेर पडू लागतात. मॅग्नेशियम, क आणि ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास आपले शरीर कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे हाडांची निर्मिती-पुनर्निर्मितीवर दुष्परिणाम होतात. पोटविकार असतील व पचनक्षमता क्षीण असेल तर पोषक द्रव्ये आणि कॅल्शियम पूरक आहार शोषला जात नाही. हाडांच्या आरोग्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल व हाडांना पूरक आहार घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सुचवतात. त्यांच्या सल्ल्यानुसार हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, फळे, भाज्या, काजू-बदाम-शेंगदाणे असे वनस्पतिजन्य अन्न सेवन करावे. मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थाचे अतिसेवन करू नये. पॅकबंद व अन्नपदार्थ टिकाऊ राहण्यासाठीचे घटक वापरलेले पदार्थ फार न खाता पौष्टिक ताजे अन्न घ्यावे. नियमित हालचाली व व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. आपल्या जीवनसत्त्वांचा स्तर नियमित तपासावा. रोज येणाऱ्या तणावाचे योग्य व्यवस्थापन करावे. अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्टता आदी विकारांकडे दुर्लक्ष न करता त्यावर सुयोग्य उपचार करून निरोगी रहावे, असेही तज्ज्ञ सुचवतात.