अनेक स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होतात. या वेदना सहसा ओटीपोटात येणाऱ्या पेटक्यांच्या म्हणजे क्रॅम्पच्या स्वरुपात असतात. यामुळे पाठ, मांड्या, कंबर आणि शरीराचे इतर अवयवही दुखू लागतात. या वेदनांमुळे काही महिलांना चालणेही अवघड होते. जवळपास ३ ते ४ दिवस अशाप्रकारच्या वेदना जाणवतात. अशा परिस्थिती अनेक महिला पेन किलर गोळी घेतात. पण या पेनकिलर गोळ्यांमुळे भविष्यात अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला असा एक रामबाण घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळेल. मासिक पाळीदरम्यान जर पोटात किंवा ओटीपोटात वेदना जाणवू लागल्या तर जिऱ्याचे पाणी सेवन करा. यामुळे वेदनांपासून तात्काळ आराम मिळू शकतो. मासिक पाळीच्या वेदनांवर जिऱ्याचं पाणी पिणे फायदेशीर जिऱ्याच्या पाण्यात भरपूर एन्झाईम्स आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे मासिक पाळीदरम्यान पाठदुखी, ओटीपोटात दुखणे आणि स्नायू क्रॅम्प येण्यापासून आराम मिळू शकतो. मासिक पाळीच्या वेदनांवर जिऱ्याचं पाणी एक रामबाण उपाय मानला जातो. जिऱ्याचे पाणी तुम्ही घरात सहज बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्ही एका स्वच्छ भांड्यात दोन ते तीन कप पाणी घ्या. यानंतर पाण्यात एक चमचा जिरे टाका. यानंतर एक चमचा गुळ मिक्स करा. दोन्ही गोष्टी पाण्यात नीट मिक्स झाल्यानंतर पाणी थोडा वेळ उकळून घ्या. पाणी उकळ्यानंतर ते एका ग्लासमध्ये काढा आणि थंड झाल्यावर प्या. जिरे आण गुळ पाणी पिण्याचे इतर फायदे सर्दी, खोकल्याच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी गुळ आणि जिऱ्याचे पाणी खूप फायदेशीर आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासह आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हे पाणी उपयुक्त आहे. तणावामुळे जर मायग्रेन किंवा डोकेदुखीची समस्या जाणवत असल्यास तुम्ही जिरे आणि गुळाच्या पाण्याचे सेवन करु शकता. यामुळे तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल. जिऱ्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते, तर गुळामुळे पचनक्रिया सुधारते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक कप जिरे आणि गुळाचे पाणी सेवन करणे शरीरास फायदेशीर ठरते.