पावसाळ्यात उदभवणाऱ्या अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश आहे. त्यात महाराष्ट्रात काही दिवसांपासून डेंग्यूचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटक, केरळ आणि इतर काही राज्यांमध्येही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. याविषयी डॉ. सुरंजित चटर्जी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
डेग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमुळे होते. त्यात अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना, स्नायू व सांधेदुखी, मळमळ, उलट्या, सूज येणे, पुरळ यांसारखी लक्षणे जाणवतात.
ही लक्षणे सहसा डास चावल्यानंतर ४ ते १० दिवसांनी दिसतात आणि २-१० दिवस टिकतात. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान करणे आवश्यक आहे. कारण- नंतर याची गंभीर लक्षणे जाणवू शकतात. त्याला डेंग्यू हेमोरेजिक ताप किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम, असेही म्हटले जाते.
या आजारात रक्तप्रवाहात गुठळ्या तयार करणाऱ्या पेशींची (प्लेटलेट्स) संख्या कमी होते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांचे गंभीर नुकसान होते. परिणामत: शॉक, अंतर्गत रक्तस्राव आणि अवयव निकामी होऊ शकतात.
डेंग्यूची चाचणी कधी करावी?
तुम्हाला वर सांगितलेल्यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, डेंग्यू NS1 अँटिजन चाचणी करावी लागते. नंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी IgM अँटीबॉडी चाचणी करण्यास सांगितले जाते. त्यावेळी CBC चाचणी करण्यासही सांगितली जाते. त्यात तुम्हाला डेंग्यूचे निदान झाल्याचे दिसले, तर प्लेटलेट्सची संख्या तपासण्यासाठी देखील एक चाचणी करण्यास सांगितली जाते.
सर्वांत महत्त्वाचे मार्कर म्हणजे PCV (पॅक्ड सेल व्हॉल्यूम) चाचणी; ज्यात रक्ताच्या घनतेचे मोजमाप केले जाते. हे लाल रक्तपेशींमध्ये वाढ किंवा निर्जलीकरण दर्शविते.
हायड्रेशन महत्त्वाचे का?
साधारणत: चार ते पाच दिवसांत ताप उतरल्यानंतर रुग्णाला बरे वाटते. पण, ताप आणि उलट्यांमुळे शरीरातील द्रवपदार्थाची कमतरता भरून काढण्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवले नाही, तर चौथ्या दिवसानंतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे रुग्णाने दिवसातून तीन ते पाच लिटर पाणी प्यावे किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, नारळाचे पाणी आणि स्वच्छ सूप प्यावे. गंभीर डेंग्यू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये प्लाझ्मा लिकेज होऊ शकते आणि हॉस्पिटल सेटिंगमध्ये इंट्राव्हेन्स (IV) फ्लुइड थेरपीची आवश्यकता भासू शकते.
गंभीर डेंग्यू संसर्ग कसा रोखायचा?
प्लेटलेट्सच्या पातळीचे निरीक्षण आणि हेमॅटोक्रिटच्या पातळीचे व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींसाठी नियमित रक्त चाचण्या करणे महत्त्वाचे आहे. हेमॅटोक्रिट पातळी म्हणजे तुमच्या रक्तातील लाल पेशींची टक्केवारी. डेंग्यूमध्ये हेमॅटोक्रिट वाढणे हा प्लाझ्मा गळतीचा; तर हेमॅटोक्रिट कमी होणे हा रक्तस्रावाचा संकेत आहे, त्यात प्लेटलेट्सची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली असल्यास तुम्हाला डॉक्टरांच्या उपचारांची गरज आहे, असा त्याचा अर्थ होतो.
डेंग्यूच्या ताप लवकर ओळखण्यासाठी हेमॅटोक्रिट पातळीचे दर २४ तासांनी निरीक्षण केले पाहिजे. तसेच डेंग्यूच्या गंभीर प्रकरणांमध्ये हेमॅटोक्रिट पातळीचे दर तीन-चार तासांनी निरीक्षण केले पाहिजे.
या आजारावर पॅरासिटामॉलसारखे वेदना कमी करणारे आणि ताप कमी करणारे औषध यावेळी फायदेशीर ठरू शकते. ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन यांसारखी नॉन-स्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी (NSAIDs)औषधे घेणे टाळा. कारण- त्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तेव्हा जास्त शारीरिक हालचाली करू नका. या काळात तुम्ही अधिक विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे.
डेंग्यूवर कोणती लस उपलब्ध आहे का?
काही राज्यांत डेंग्यूची लस (डेंगव्हॅक्सिया) उपलब्ध आहे; पण, ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला आहे, त्यांच्यासाठी या लसीची शिफारस केली जाते. भारतात यासंबंधीच्या चाचण्या चालू आहेत; परंतु डेंग्यूसारख्या गंभीर आजाराच्या विषाणूवर प्रभावी लस शोधणे हे एक आव्हान आहे.
© IE Online Media Services (P) Ltd