Mental Health Special, How To Be Stress Free: प्रेशर कुकरमध्ये डाळ आणि भात शिजत ठेवून आपण निश्चिंत असतो. आपल्याला माहीत असते, कुकरची शिट्टी वाजेल, आत साठलेला हवेचा दाब कमी होईल आणि वेळेची बचत करत अन्न शिजेल. सर्वसाधारणपणे असेच घडते. पण एखादे वेळेस मात्र हवेचा दाब वाढत राहतो, शिट्टी वाजतच नाही आणि कुकरचे झाकण छताच्या दिशेने जोरात उडते, जणू स्फोटच होतो. मनाचेही असेच आहे. मनातला ताण वाढत राहतो. बहुतेकदा आपण तो कमी करण्यात यशस्वी होतो, पण एखादे वेळेस मात्र ताण प्रमाणाबाहेर वाढतो आणि त्याच्या भाराखाली मन मोडून जाते, मानसिक विकार होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या शरीरावर, मनावर ज्या गोष्टीचा भार वाटतो, तो म्हणजे ताण. ‘परिस्थिती तणावपूर्ण बनली’, असे बातम्यांमध्ये आपण ऐकतो. मनावरचा ताण वाढणे, म्हणजे मनाची स्थिती तणावपूर्ण बनणे! आपल्या शिक्षणातली आत्ताची स्थिती उदा. जवळ आलेली परीक्षा, किंवा नोकरीमध्ये जवळ अलेली डेडलाईन, घरातली अवघड परिस्थिती, आजारपणे, आर्थिक अडचण, घरतल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नातेसंबंधातील गुंतागुंत, अशा अनेक गोष्टींचा आपल्या मनावर ताण येतो. आधुनिक काळात सौंदर्याच्या कल्पना, सोशल मिडिया ही सुद्धा मनावरचा ताण वाढवतात.

मानसिक ताण वाढला की अनेक शारीरिक तक्रारी सुरू होतात, जसे की वारंवार होणारी डोकेदुखी, पाठदुखी, अपचन, थकवा आणि गळून जाणे आणि लक्ष केंद्रित न होणे, चिडचिड, छोट्या छोट्या चुका होणे, कोणताही निर्णय घेणे कठीण जाणे असा मानसिक परिणामही दिसून येतो. आपले आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या मंडळींना आपल्यातील हे बदल जाणवतात. कोणीतरी आपली प्रेमाने चौकशी करते, कोणी आपल्याला बोलते करण्याचा प्रयत्न करते तर कोणी ‘सुट्टी’ घेण्याचा सल्ला देते. आपल्याला वाटते, “मला काय झालंय? रोज कामावर येतो आहे, सगळी कामे पार पडतो आहे, मित्रांना भेटतो आहे, टीव्ही बघतो आहे, रोज व्यायाम करतो आहे, मग स्ट्रेस आपोआप कमी होईल की!”

पण आपल्याला जाणवणारा ताण कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मनावर ताण म्हणजे शरीराला आणि मनाला जाणवणारा धोका! कोणत्याही धोक्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या मेंदूमध्ये विशिष्ट संदेश जातात, शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो, cortisol सारखे अंतर्द्रव्य तयार होते आणि शरीर लढाईच्या पवित्र्यात तरी जाते, पळून जाण्याची तयारी करते किंवा एका जागी गोठून जाते. असेच काहीसे आपले मनही करू शकते. “कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते आहे” असे एखाद्याला वाटते, तेव्हा खरोखरच २ दिवस सुट्टी घेऊन घरच्यांबरोबर मजा करून यावे.

एखादेवेळेस ऑफिसमधल्या कामाच्या वाढत्या मागण्यांपासून पळून जाऊन आपल्या जवळच्या मित्राला भेटावे, नवऱ्याबरोबर कॉफी प्यायला जावे. अशा पळून जाण्यातून भावनिक आधार मिळतो आणि मानसिक बळ वाढते. मानसिक तणाव कधी वाढेल हे काही नियोजित नसते. त्यामुळे ताणतणावाला सामोरे जाण्याची आपली तयारी करणे आवश्यक! पळणे, सायकल चालवणे, मैदानी खेळ खेळणे अशा शारीरिक व्यायामातून मनाची शक्ती वाढते आणि मानसिक ताणाला सामोरे जाण्याचे बळ वाढते. ‘ नाही’ म्हणायला शिकणे हेही असेच महत्त्वाचे.

परिस्थितीपासून पळून न जाता त्याच्याशी प्रत्यक्ष दोन हात करायचे ठरवले तर आलेल्या समस्येला भिडावे लागते. काय प्रश्न आहे त्याची फोड करून, विविध पर्यायांचा विचार करून, एक पर्याय निवडून, निर्णय करून त्याची कार्यवाही करणे अशा सगळ्या पायऱ्या चढत चढत त्या समस्येवर मात करावी लागते. अशा प्रकारे तोंड देण्याचे प्रशिक्षण आपल्या शरीराला आणि मनाला मिळावे या साठी कुणी मार्शल आर्ट शिकावे, कोणी अवघड कोडी सोडवण्याचा छंद जोपासावा, कोणी उजवा आणि दावा दोन्ही हात तितक्याच कौशल्याने वापरण्याची सवय करावी! मनाची तयारी अशी की संकटांचा पर्वतही सहजपणे उचलता यावा. एखादेवेळेस समोरील प्रश्नावर तोडगा म्हणून एखादी व्यक्ती काही काळ स्तब्ध होऊन जाते. थोडा वेळ प्रश्न मुरवत ठेवू म्हणजे उत्तर सापडेल असा कोणी विचार करते, तर कोणी उत्तर शोधण्यासाठी मुदत वाढवून घेते. यामुळे विचार करायला वेळ मिळतो. कोणत्याही परिस्थितीत मन शांत राहावे यासाठी, योग, प्राणायाम, ध्यान यांचा अतिशय चांगला परिणाम होतो. आपले शरीर आणि मन दोन्ही स्थिर होते.

अशा प्रकारे ताणतणावाला सामोरे जाण्याची पूर्वतयारी करताना आणि बिकट परिस्थितीशी सामना करताना वेळेचे नियोजन करणे फार महत्त्वाचे ठरते. आपल्या समोरील ध्येयाची स्पष्टता असणे आणि त्याचे टप्पे ठरवणे उपयोगी ठरते. करण्याच्या कामांची यादी करणे, ती वारंवार तपासून पाहणे, कामांचा पाठपुरावा करणे अशा सवयी मनाचा गोंधळ होऊ देत नाहीत. एका शिस्तीत आपल्या वस्तू, आपली खोली, आपले कामाचे टेबल असेल तर वेळ वाचतो.

मनातल्या विचारंची सकारात्मकता आपोआप मनोधैर्य वाढवते. आपला आपल्याशी संवाद कसा ठेवायचा हे आपणच ठरवावे लागते. आपले नातेसंबंध आपण जपले, जोपासले तर अडचणीच्या वेळी आपल्या पाठीवर हात फिरवून धीर द्यायला आपल्या भोवती माणसे असतात. आपल्या मनातल्या श्रद्धाही, अंतर्मुख होणे, अध्यात्मिकता आपल्याला ताण तणावाला सामोरे जाताना उपयोगी पडतात.

हे ही वाचा<< आल्याचे तेल पोटावर लावून फॅट्स व वजन झपाट्याने कमी होते? आल्याच्या सेवनाबाबत तज्ज्ञांचं मत जाणून घ्या

मनाचा ताणलेला रबर सैल कसा करायचा याचे असे अनेक तंत्र आणि मंत्र! आपल्याला जो भावेल, आवडेल तो घ्यावा आणि पुढच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जावे! एका जुन्या गाण्याची ओळ आहे ना ‘ मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची”
तसेच म्हणूया,

‘ मन मुक्त तुझं, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची!
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची.’

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feel like running away how to be happy treat depression and lonely feeling simple tips to be more productive and stress free svs
First published on: 08-06-2023 at 14:36 IST