Kidney Stone Causing Vegetables: किडनीचे म्हणजेच मूत्रपिंडाचे वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. हृदयरोगाप्रमाणेच कमी वयातच किडन्यांचे आजारही वाढत आहेत. किडनी हा शरीरातील एक लहानसा अवयव होय; पण तो आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. किडनी निकामी होण्याची समस्या गेल्या काही वर्षांत अधिक दिसून येत आहे. किडनीचा आजार जितका धोकादायक आहे, तितकाच हा आजार उशिरा ओळखला जातो, त्यामुळे किडनीची थोडीशी समस्यादेखील किडनी पूर्णपणे खराब होण्याचे कारण बनते. भारतात किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य प्रशिक्षक करिश्मा शाह यांनी किडनी स्टोनचा त्रास वाढण्यासाठी दोन भाज्या मुख्य कारण ठरू शकतात, याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…
करिश्मा शाह सांगतात, “शरीरामध्ये खनिजे आणि क्षार पदार्थ यांची मात्रा वाढल्यास शरीरामध्ये किडनी स्टोन तयार होऊ लागतो. किडनी स्टोन ही एक फार असह्य वेदना देणारी आणि कुणालाही होणारी समस्या आहे. किडनीमध्ये स्टोन कॅल्शिअम ऑक्सालेटमुळे तयार होतात. लघवीमध्ये जेव्हा कॅल्शिअम आणि ऑक्सालेट दोन्हींचं प्रमाण अधिक वाढतं, तेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र जमा होतात आणि छोटे छोटे स्टोन तयार होतात. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनी स्टोनची समस्या होते. भरपूर पाणी पिण्यासोबतच तुम्हाला खाण्या-पिण्याकडेही नीट लक्ष दिले पाहिजे. दररोज खाल्ले जाणारे काही पदार्थ हे किडनी स्टोनचा त्रास वाढवू शकतात. एवढेच नव्हे तर तुम्ही या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केले तर किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.”
करिश्मा शाह यांच्या माहितीनुसार, “किडनी स्टोनचा त्रास वाढण्यासाठी दोन भाज्या मुख्य कारण ठरू शकतात, त्यामुळे या भाज्या चुकूनही कच्च्या खाऊ नये; त्यामुळे कालांतराने किडनी पूर्ण निकामी होण्याचासुद्धा धोका असतो. पालक व केल या दोन भाज्या जर आपण कच्च्या खाल्ल्या तर यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. यात भर घालत त्यांनी नमूद केले की, या दोन्ही भाज्या कच्च्या खाल्ल्यास किडनी स्टोन, आयबीएस, गाउट, पोटफुगी आणि गॅसचा धोका वाढू शकतो. ज्यांना आधीच सांधेदुखी, सूज आणि जळजळ आहे, त्यांच्यासाठी पालकाचे जास्त सेवन करणे त्रासदायक ठरू शकते.”
केल म्हणजे ‘पालक’ या पालेभाजीसारखी दिसणारी एक हिरवीगार भाजी आहे. तिला ‘केले’ (kale) म्हणूनही ओळखले जाते. ही भाजी खूप पौष्टिक असून त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात. अनेकदा सुपरफूड्स म्हणून लेबल केलेले केल आणि पालक या भाज्या विविध रंग, आकारामध्ये येतात. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, या भाज्या हृदयरोग आणि कर्करोगापासून संरक्षण करतात असे दिसून आले आहे आणि फायबर, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमने भरलेल्या आहेत. पण, या भाज्या कच्च्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे तितकेच खरे आहे.
पालक व केलच्या भाजीत भरपूर फायबर, जीवनसत्त्वे ए, सी, के आणि लोहासारखी खनिजे असतात, पण कच्च्या पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असते. हा एक असा सेंद्रिय पदार्थ आहे, जो कॅल्शियम आणि लोहसारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतो आणि यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
तसेच, जठरासंबंधी किंवा आतड्यांच्या आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी पालक आणि केल कच्चे खाणे टाळावे, कारण त्यामुळे आम्लता किंवा पोटदुखी होऊ शकते. खरं तर कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या कच्च्या खाल्ल्याने हे दुष्परिणाम होऊ शकतात. ते पूर्ण प्रमाणात खाण्यापूर्वी ते तपासणे आणि त्यामुळे मळमळ किंवा पोटफुगी होत आहे का ते तपासणे कधीही चांगले असल्याचे त्या सांगतात.
त्यामुळे पालक आणि केल शिजवून हलके वाफवून किंवा काही मिनिटे ब्लँचिंग केल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील आणि ते सेवन करणे सुरक्षित होईल. यामुळे समस्या टाळता येतील, असे त्या नमूद करतात.