Kerala Nipah virus deaths : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पाच संसर्ग आणि दोन मृत्यूंची नोंद झाल्याने, सरकारने ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या अनधिकृत औषध (compassionate drug use) मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या लहान टप्प्याच्या पहिल्या चाचणीमध्ये अँटीबॉडीज सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले असले तरी जास्त संख्या असलेल्या मानवी चाचणीमध्ये ते निपा विषाणूविरुद्ध प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. तरीही सरकारने या औषधाच्या वापरास अखेर परवानगी का दिली, असा प्रश्न उपस्थित होतो.
सरकारने का दिली मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या वापरास परवानगी?
प्रथम कारण म्हणजे लक्षणे दूर करण्याव्यतिरिक्त निपा विषाणूच्या संसर्गावर कोणताही प्रभावी उपचार नाही. एकदा संसर्ग झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण ४० ते ७५ टक्के इतके जास्त असू शकते. तुलना करायची तर कोविड-१९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव शिखरावर पोहोचला असतानाही केस फॅटॅलिटी रेशो (CFR) म्हणजेच पॉझिटिव्ह चाचणी घेणाऱ्यांमध्ये मरण पावलेल्या लोकांचे प्रमाण हे जवळपास तीन टक्के होते.




हेही वाचा – केरळमध्ये पुन्हा निपा विषाणूचा उद्रेक! हा विषाणू कसा पसरतोय? जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय…
दुसरे कारण म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर आतापर्यंत जागतिक स्तरावर १४ व्यक्तींमध्ये झाला आहे आणि त्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही.
“मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर भारतात कधीही झाला नाही. त्याच्या कोणत्याही चाचण्या झालेल्या नाहीत. कारण- असे करण्यासाठी संसर्गाची अनेक प्रकरणे आवश्यक आहेत आणि सुदैवाने तसे झाले नाही. सर्वांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे आतापर्यंत १४ लोकांना अँटीबॉडीज दिल्या गेल्या आहेत आणि त्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. निपाचा मृत्यू दर ४० ते ७५ टक्के आहे,” असे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.