Bhagyashree health advice: शरीरात योग्य पाण्याची पातळी राखणे अत्यंत आवश्यक असते. विशेषत: उन्हाळ्यात. अनेकदा पुरेसे पाणी पिऊनही शरीरातील पाण्याची पातळी कमी असल्याचे जाणवते. कारण हायड्रेशन म्हणजे फक्त पुरेसे पाणी पिणे नव्हे. शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी शरीरात पाणी टिकून राहणे आवश्यक असते. त्यासाठी फक्त पाणी पिण्याऐवजी अल्कलाइन वॉटरपासून ते स्पार्कलिंग वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स आणि लिक्विड आयव्हीपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यात मदत करतात.

इलेक्ट्रोलाइट्सचे कार्य

इलेक्ट्रोलाइट्स ही सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखी आवश्यक खनिजे आहेत, जी पाण्यात विरघळल्यावर विद्युत प्रभार वाहून नेतात आणि आपले शरीर योग्यरित्या कार्य करत ठेवतात. आपल्या शरीराला हे इलेक्ट्रोलाइट्स आपण खातो त्या अन्नातून आणि पितो त्या पेयांमधून मिळतात. ते शरीराला विविध कार्ये करण्यास मदत करतात, जसे की पेशींपर्यंत पोषक तत्वे पोहोचवणे, पेशींमधून टाकाऊ पदार्थ काढून टाकणे, खराब झालेल्या उतींच्या पुनर्निर्मितीस मदत करणे, शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवणे आणि मज्जासंस्था, स्नायू, हृदय व मेंदूच्या कार्याचे नियमन करणे.

अभिनेत्री भाग्यश्रीचा मोलाचा सल्ला

याबाबत ‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला. तिने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, “होळीनंतर उष्णता नेहमीच वाढते… म्हणून हायड्रेटेड राहण्यासाठी ही एक सोपी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते योग्य मिठ वापरत आहात याची खात्री करणे.”

अभिनेत्रीने स्पष्ट केले की,”जेव्हा तुम्हाला तीव्र उष्णता जाणवते किंवा घाम येतो, तेव्हा शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी फक्त पाणी पुरेसे नसते, कारण तुमच्या शरीरातील पोटॅशियम, सोडियम आणि सोडियम क्लोराईडची पातळी कमी होऊ लागते. पोटॅशियम तुमच्या शरीरातील पेशींमध्ये पाण्याचे रेणू खेचण्यास मदत करते, तर क्लोराईड द्रवाचे संतुलन राखण्यास मदत करते, कारण पेशींमध्ये जास्त पाणी झाल्यास सामान्यपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.”

हायड्रेशन म्हणजे फक्त पाणी नव्हे

भाग्यश्रीच्या मते,”मुळात, जेव्हा तुम्हाला उष्णतेमुळे चक्कर येते, तेव्हा हे तुमच्या शरीरात पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे. हे पाण्यात विरघळणारे क्षार आहेत जे शरीर आणि मेंदू यांच्यात संदेश पोहोचवतात. म्हणून, व्यायामानंतर किंवा उष्ण महिन्यांमध्ये, डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी तिने नारळाचे पाणी, लिंबाचे पाणी किंवा पाण्यात इलेक्ट्रोलाइट मिश्रण पिण्याची शिफारस केली जाते.”

तुम्ही कोणते इलेक्ट्रोलाइट्स निवडावेत?

मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालय क्रीडा पोषणतज्ज्ञ सल्लागार, पूजा उदेशी यांनी तुमच्या दैनंदिन गरजेनुसार इलेक्ट्रोलाइट्सबद्दल एक संक्षिप्त मार्गदर्शक माहिती दिली आहे.

नियमित आहार:

बहुतेक लोकांसाठी, पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध पदार्थांनी दैनंदिन हायड्रेशनची गरज भागवता येते. केळी, पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे, दही आणि नारळाचे पाणी हे उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत आहेत. जर तुम्ही जास्त व्यायाम करत नसाल किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत नसाल, तर हे दैनंदिन सेवन सहसा पुरेसे असते.

व्यायामानंतर:

उष्णतेतील व्यायाम आणि घराबाहेरील क्रियाकलापांमुळे जास्त घाम येऊ शकतो आणि त्यामुळे सोडियम व पोटॅशियमची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणूनच, खेळाडू अनेकदा स्पोर्ट्स ड्रिंक्सवर अवलंबून असतात. एक सोपा पर्याय म्हणजे घरी बनवलेले मिश्रण: पाणी, चिमूटभर मीठ, लिंबू आणि थोडे मध. हे मिश्रण साखर किंवा इतर पदार्थांशिवाय इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करते.

जेव्हा रक्तदाब कमी असतो:

ज्या लोकांना कमी रक्तदाबामुळे चक्कर किंवा थकवा जाणवतो, त्यांच्यासाठी सोडियम एक महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांच्या आहारात थोडे अधिक मीठ घालणे किंवा पातळ सूप आणि तोंडावाटे दिले जाणारे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन पिणे उपयुक्त ठरू शकते. पण, प्रमाणापेक्षा जास्त बदल टाळणे महत्त्वाचे आहे – कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

उष्णता किंवा आजारपणाचा सामना करणे:

उष्ण हवामान, निर्जलीकरण, उलट्या किंवा अतिसारामुळे शरीरातील आवश्यक क्षार वेगाने कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन) हा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे, कारण ते लवकर शोषले जाण्यासाठीच बनवलेले असते. एनर्जी ड्रिंक्स किंवा जास्त कॅफीन असलेली पेये टाळावीत, कारण त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता आणखी वाढू शकते.

उन्हाळ्यात शरीरात योग्य पाण्याची पातळी राखणे म्हणजे केवळ तहान लागल्यावर पाणी पिणे नव्हे, तर शरीराला आवश्यक असलेले मीठ व इलेक्ट्रोलाइट्स संतुलित प्रमाणात मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असलेले पदार्थ समाविष्ट केल्यास थकवा, चक्कर येणे किंवा अशक्तपणा यांसारख्या समस्या टाळता येऊ शकतात. मात्र, कोणतेही रेडीमेड ड्रिंक किंवा मीठाचे प्रमाण अति घेणे टाळावे. विशेषत: ज्यांना रक्तदाब, किडनी किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य सवयींमुळे शरीर निरोगी आणि ताजेतवाने राहू शकते.