अनेकांसाठी सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी अंथरूण नीट आवरणे हे शिस्तीचे आणि दिवसाच्या चांगल्या सुरुवातीचे लक्षण मानले जाते. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमची ही चांगली सवय तुमच्या झोपेच्या आरोग्यासाठी (Sleep Hygiene) घातक ठरू शकते. ‘आकाश हेल्थकेअर’मधील श्वसन आणि झोप विकार विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बुधराजा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

लगेच अंथरूण का आवरू नये?

आपण जेव्हा सकाळी झोपून उठतो, तेव्हा आपले अंथरूण दिसते तितके स्वच्छ नसते. रात्री झोपताना आपल्या शरीरातील उष्णता, घाम आणि ओलावा चादरीमध्ये आणि गादीमध्ये शोषला जातो. डॉ. बुधराजा यांच्या मते, “सकाळी उठल्या उठल्या लगेच अंथरूण आवरल्यामुळे हा ओलावा गादीतच अडकून राहतो. यामुळे तिथे उबदार आणि दमट वातावरण तयार होते, जे ‘डस्ट माईट्स’ (धुळीतील सूक्ष्म जीव) वाढण्यासाठी अत्यंत पोषक असते.”

हे सूक्ष्म जीव मानवी मृत त्वचेवर जगतात आणि दमट जागी वेगाने वाढतात. यामुळे अंगाला खाज सुटणे, ॲलर्जी होणे किंवा श्वसनाचे त्रास उद्भवू शकतात.

अंथरूणाला ‘श्वास’ घेऊ द्या

सकाळी उठल्यावर चादरीची घडी घालण्याऐवजी, अंथरूण काही काळ तसेच उघडे ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. असे केल्याने खालील फायदे होतात.

  • अंथरूणात अडकलेली उष्णता आणि ओलावा बाहेर पडतो.
  • चादरी आणि गादी पूर्णपणे कोरडी होते.
  • डस्ट माईट्सच्या वाढीसाठी प्रतिकूल वातावरण तयार होते.

ॲलर्जीचा धोका

डॉ. बुधराजा सांगतात की, डस्ट माईट्स जवळजवळ सर्वच घरांमध्ये असतात, मात्र ओलावा आणि उष्णतेमुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. ज्यांना आधीच ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही स्थिती शिंका येणे, नाक चोंदणे किंवा त्वचेची जळजळ यांसारखी लक्षणे वाढवू शकते. त्यामुळे अंथरूण काही वेळ हवेवर उघडे ठेवणे हा एक प्रभावी उपाय आहे.

सकाळची दिनचर्या कशी असावी?

डॉ. बुधराजा यांनी अंथरूणाची स्वच्छता राखण्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत:

१. पांघरूण बाजूला करा: सकाळी उठल्यावर चादर किंवा ब्लँकेट पूर्णपणे बाजूला करा जेणेकरून गादीला हवा लागेल.
२. नैसर्गिक प्रकाश: खोलीच्या खिडक्या आणि पडदे उघडा, जेणेकरून सूर्यप्रकाश आत येईल.
३. २०-३० मिनिटे थांबा: अंथरूण आवरण्यापूर्वी किमान अर्धा तास ते तसेच राहू द्या.
४. नंतर अंथरूण आवरा: ओलावा पूर्णपणे निघून गेल्यावरच चादरीच्या घड्या घाला.

यासोबतच, झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दर आठवड्याला चादरी बदलणे आणि त्या धुणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.